अमरावती , राज माहोरे (प्रतिनिधी) : यंदाच्या गणेशोत्सवात केवळ भक्तीच नव्हे, तर समाजातील ज्वलंत प्रश्नांनाही वाचा फोडण्याचा प्रयत्न आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. कुरळपूर्णा येथील त्यांच्या निवासस्थानी साकारण्यात आलेला गणेशोत्सवी देखावा सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला असून, शासन व प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा हा देखावा नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
“काय बच्चू तू गप्प का? सरकार करत नसेल तर काढ आपलं आंदोलनाचं शस्त्र!” या आशयाच्या प्रभावी थीमवर आधारित या देखाव्यात सर्वसामान्यांच्या वेदना, संताप आणि अपेक्षांना मूर्त स्वरूप देण्यात आले आहे. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयू आगीत मृत्युमुखी पडलेले तीन निष्पाप बालक, वाघाच्या हल्ल्यात जीव गमावलेले नागरिक, वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे उद्ध्वस्त होत असलेली शेती, शेतकऱ्यांना भेडसावणारी बियाण्यांची टंचाई, शेतमालाचे नुकसान तसेच शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे त्रस्त झालेल्या दिव्यांग, एकल महिला, विधवा आणि शेतमजुरांच्या प्रश्नांचे वास्तवदर्शी चित्रण या देखाव्यात करण्यात आले आहे.
“बालबळींचा हुंकार, वाघाचा वार, रानडुकरांचा कहर; गणराया, तूच वाचव आमचं वावर अन् संसार!” हा संदेश या देखाव्याचा केंद्रबिंदू ठरत असून, सामान्य जनतेच्या मनातील वेदना आणि आक्रोश व्यक्त करणारा आहे. गणेशोत्सवाच्या पवित्र वातावरणात उभारण्यात आलेला हा प्रतीकात्मक देखावा केवळ सजावट नसून, शासनाचे लक्ष दुर्लक्षित प्रश्नांकडे वेधणारा सामाजिक संदेश असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. तीन दिवसांसाठी उभारण्यात आलेल्या या देखाव्याला परिसरातील नागरिक, शेतकरी आणि युवकांकडून मोठी पसंती मिळत आहे.
पीडित शेतकरी, शेतमजूर आणि वंचित घटकांच्या व्यथा शासनापर्यंत पोहोचाव्यात, संबंधित विभागांनी जबाबदारी स्वीकारून ठोस उपाययोजना कराव्यात आणि जनतेच्या प्रश्नांवर संवेदनशीलतेने निर्णय घ्यावेत, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे. गणरायाच्या साक्षीने उभारलेला हा देखावा सामाजिक जागृतीचा संदेश देत शासनालाच आत्मपरीक्षणाचा सवाल विचारत असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.


