नायगाव, रविन्द्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : तालुक्यातील मुगाव तांडा येथील मुख्याध्यापक मनोहर गायकवाड यांच्याविरोधातील तक्रारींच्या चौकशीचा अहवाल सादर होऊनही प्रशासनाकडून पुढील कारवाई होत नसल्याने प्रकरण पुन्हा ऐरणीवर आले आहे. तातडीने कारवाई करण्याच्या मागणीसाठी जनार्दन गायकवाड पाटील आणि हनुमंत रावसाहेब चव्हाण यांनी सोमवारी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले.
मुख्याध्यापकांविरोधातील तक्रारींची चौकशी नायगावचे गटशिक्षणाधिकारी दर्शनवाड यांनी केल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. चौकशीअंती मुख्याध्यापक दोषी असल्याचा अहवाल वरिष्ठ पातळीवर सादर करण्यात आल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. मात्र, अहवाल प्राप्त होऊनही निलंबन अथवा विभागीय चौकशी सुरू करण्याबाबत ठोस निर्णय न झाल्याने शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गेल्या दीड महिन्यापासून विविध निवेदने, तक्रारी आणि आंदोलनांच्या माध्यमातून या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले. चौकशीमध्ये दोष आढळल्याचे नमूद केले जात असताना संबंधितांवर कारवाई करण्यास विलंब का केला जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांच्या भूमिकेबाबतही तक्रारदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. चौकशी अहवालानंतरही निर्णय होत नसल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मुख्याध्यापकांच्या न्यायालयीन उपस्थितीच्या दिवशी शाळेच्या हजेरीपटावर उपस्थिती नोंदविल्याचा कथित प्रकारही आंदोलनकर्त्यांनी समोर आणला आहे. या प्रकरणाची स्वतंत्रपणे सखोल चौकशी करून तथ्य समोर आणावे आणि नियमभंग झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मुंडण आंदोलनाचा इशारा
प्रशासनाने आंदोलनाची दखल न घेतल्यास आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा इशारा देण्यात आला आहे. मंगळवारी सामूहिक मुंडण आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती बालाजी पाटील ढोसणे यांनी दिली. चौकशी अहवालावर तातडीने निर्णय घेऊन मुख्याध्यापकांवर निलंबनाची कारवाई करावी अथवा नियमानुसार विभागीय चौकशी सुरू करावी, या मागणीवर उपोषणकर्ते ठाम आहेत.


