राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला, तरी आज पुन्हा काही भागांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुणे, सातारा घाटमाथा आणि जळगाव जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी केला असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर आज मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर जळगाव जिल्ह्यात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि हवामानातील बदलांवर लक्ष ठेवावे. दरम्यान, मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्हे तसेच मराठवाड्यात अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडू शकतात. दिवसभर ऊन आणि ढग यांचा लपंडाव सुरू राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
शेतीची कामे सुरू असलेल्या शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन नियोजन करावे, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे. तसेच विजांचा कडकडाट सुरू असताना झाडाखाली थांबणे टाळावे आणि डोंगराळ भाग, घाटरस्ते तसेच नदी-नाल्यांच्या परिसरात विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे.


