मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सोमवारी धानिवरी येथे एका साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी लोकांना घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला होता. या ट्रकला एका कंटेनरने धडक दिली होती. यामध्ये साखरपुड्याला जात असलेले 100 जण जखमी झाले होते. यापैकी 13 जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर बापूगाव येथील लाखातपाड्यावर अक्षरश: स्मशानशांतता पसरली होती. काल दुपारी चार वाजता साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी मुलाचे सर्व नातेवाईक बापूगावातून निघाले होते. मात्र, गावातून बाहेर पडल्यानंतर काही अंतरावरच त्यांच्या ट्रकचा भीषण अपघात झाला. अपघातामध्ये मृत्यू झालेल्या 13 जणांपैकी 12 जणांवर आज लाखनपाडा येथे एकत्रच अंत्यसंस्कार करण्यात आले.
या अंत्यसंस्कारावेळी आपल्या आप्तेष्टांना निरोप द्यायला सर्व गावकरी लाखनपाडा येथे जमले होते. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, खासदार हेमंत सावरा, आमदार राजेंद्र गावित, आमदार विलास तरे, आमदार विनोद निकोले, आमदार हरिश्चंद्र भोये हे घटनास्थळी उपस्थित होते. यावेळी 12 मृतदेह एका रांगेत ठेवण्यात आले होते. हे सर्वजण एकमेकांचे नातेवाईक होते. या अंत्यसंस्कारावेळी बापूगावातील वातावरण अत्यंत भावूक झाले होते. याठिकाणी स्त्रिया मोठमोठ्याने रडून आक्रोश करत होत्या. अंत्यसंस्कारावेळचे हे दृश्य अक्षरश: डोळे पाणावणारे होते. संपूर्ण गावातील लोक याठिकाणी मोठ्या संख्येने हजर होते. घरातील मंगलकार्यासाठी निघालेल्या 12 जणांचा अशाप्रकारे दुर्दैवी शेवट झाल्याने गावातील प्रत्येकाच्या मनाला चुटपूट लागून राहिली.
17 जखमींवर अजूनही डहाणूच्या धुंदलवाडी येथील वेदांता रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांना उपचारादरम्यान कोणतीही अडचण येणार नाही. यासाठी आदिवासी विकास विभाग त्यांचं पालकत्व स्वीकारत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत तातडीने मदत जाहीर केल्याच उईके यावेळी म्हणाले . तसेच जखमींच्या कुटुंबीयांना रुग्णालय ते गाव असं ये-जा करण्यासाठी तसंच त्यांच्या राहण्याची पूर्ण व्यवस्था आदिवासी विकास विभाग करत असून आम्ही कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासनदेखील यावेळी उईके यांनी दिले. काल दुपारी चार वाजण्याच्या सुमारास साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी जवळपास 100 जणांचे वऱ्हाड बापूगाव येथून खडकीपाडा येथे जायला निघाले होते. धानिवरी खडकीपाडा येथे जाण्यासाठी महामार्गावर हॉटेल तुळशी येथून युटर्न घेऊन पुन्हा मागे यावे लागते. हा मोठा वळसा टाळण्यासाठी टेम्पो चालकाने धानिवारी पुलाखालून वळण घेतले. तेथून खडकीपाडा अर्ध्या किलोमीटरवर असल्याने टेम्पो चालकाने टेम्पो राँग साईडने नेला. त्यावेळी समोरुन येणाऱ्या कंटेनर दुभाजकावर चढून टेम्पोवर पडल्याने मोठा अपघात झाला.
आयशर ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त म्हणजेच 100 हून अधिक वऱ्हाडी प्रवास करत होते. गाडीत असणारे सर्व वऱ्हाडी एकमेकांसोबत गप्पा मारत, मजा-मस्करी करत अत्यंत उत्साहाच्या वातावरणात लग्नाच्या आणि साखरपुड्याच्या गप्पांमध्ये रंगले होते. सर्वांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद होता. मात्र, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. वऱ्हाडाचा हा आयशर ट्रक नवरीच्या घराजवळ पोहोचलाच होता, तेव्हाच हा अपघात घडला आणि होत्याचं नव्हतं झालं.


