अमरावती, राज माहोरे ( प्रतिनिधी ) : रक्षाबंधनाच्या निमित्ताने शंकर नगर येथे आयोजित भव्य सामूहिक रक्षाबंधन सोहळ्यात अमरावतीचे आमदार रवि राणा यांना हजारो महिलांनी राखी बांधून शुभेच्छा दिल्या. सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत झालेल्या या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या सोहळ्यात महिलांनी गीत, कविता तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत आ. राणा यांच्या कार्याबद्दल भावना व्यक्त केल्या. महिलांसाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे आणि त्यांच्या प्रश्नांवर घेतलेल्या भूमिकेचे यावेळी कौतुक करण्यात आले.
लाडक्या बहिणींच्या मानधनात वाढ करण्याची मागणी
कार्यक्रमात बोलताना आ. रवि राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लाडक्या बहिणींच्या मानधनात वाढ करण्याची मागणी केली. सध्या मिळणारे १,५०० रुपयांचे मासिक मानधन ३,००० रुपये करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. यासाठी आमदार आणि खासदारांचे वेतन कमी करण्याचा विचार शासनाने करावा, असेही त्यांनी सुचविले.
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मानधनात वाढ आवश्यक असल्याचे सांगत आ. राणा म्हणाले, “लाडक्या बहिणींचे प्रेम आणि आशीर्वाद हीच माझी खरी ताकद आहे. रक्षाबंधनाच्या या पवित्र पर्वावर हजारो बहिणींनी व्यक्त केलेला विश्वास माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या सुख-दुःखात भाऊ म्हणून कायम उभा राहण्याचा प्रयत्न राहील.”
सकाळपासून महिलांची गर्दी
कार्यक्रमस्थळी सकाळपासूनच महिलांची मोठी गर्दी झाली होती. विविध भागांतून आलेल्या महिलांनी आ. राणा यांना राखी बांधून त्यांच्या दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यामुळे शंकर नगर परिसरात दिवसभर उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरण पाहायला मिळाले.
या कार्यक्रमाला उपमहापौर सचिन भेंडे, गटनेते नाना आमले, नगरसेवक प्रशांत वानखडे, अजय जयस्वाल, नगरसेविका सुमती ढोके, शिक्षण सभापती ॲड. प्रिती रेवणे, अर्चना पांडे, रजनी डोंगरे, गौरी मेघवानी, नगरसेवक योगेश विजयकर, नगरसेविका मीरा कांबळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. महिला जिल्हाध्यक्षा सोनाली नवले यांच्यासह विविध महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या आणि हजारो महिलांनी या सामूहिक रक्षाबंधन सोहळ्यात सहभाग घेतला.



