स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा, मराठा उपसमिती बरखास्त करा: मनोज जरांगें

भाजप नेते प्रसाद लाड यांनी आज अंतरवालीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा रणशिंग फुंकले आहे. 30 मे पासून मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहेत. मात्र मनोज जरांगेंनी उपोषणाला बसू नये, असं आवाहन भाजपचे नेते प्रसाद लाड यांच्याकडून करण्यात आले होते. यानंतर मनोज जरांगे यांनी प्रसाद लाड यांना अंतरवालीमध्ये येण्याचं आवाहन केलं होतं. मनोज जरांगेंच्या या आवाहनानंतर आज प्रसाद लाड अंतरवालीत भेटीसाठी पोहोचले.
58 लाख नोंदींचे काय झाले सांगा. नोंदी सापडून तुम्ही प्रमाणपत्र का दिले नाहीत..?, असा सवाल मनोज जरांगेंनी प्रसाद लाड यांना विचारला. मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 29 मे 2026 पर्यंतची अंतिम मुदत (डेडलाईन) दिली आहे. 29 मेच्या आत मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे वाटप करण्यात यावीत, अशी त्यांची मुख्य मागणी आहे. मुंबई आंदोलनादरम्यान राज्य सरकारने दिलेली आश्वासने 8 महिने उलटूनही पूर्ण केली नसून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची दिशाभूल व फसवणूक केल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. तसेच मराठा आरक्षणासाठी नेमण्यात आलेली मंत्रिमंडळ उपसमिती तात्काळ बरखास्त करावी, अशीही मागणी मनोज जरांगेंनी केली आहे. मनोज जरांगेंच्या नेमक्या 10 मागण्या कोणत्या, जाणून घ्या

मनोज जरांगे यांच्या 10 मागण्या काय?
1) मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना 29 मे च्या आता कुणबी प्रमाणपत्र द्या.

2) सातारा, कोल्हापूर, औंध आणि पुणे, मिरज संस्थांचा GR काढा. 1994 च्या धर्तीवरच GR काढा.

3) महाराष्ट्रातील सर्व सरसकट गुन्हे मागे घ्या.

4) आंदोलनात बलिदान देणाऱ्या कुटुंबीयांना महावितरण आणि MIDC मध्ये नोकरीचा GR काढा.

5) सारथीच्या सर्व योजना पुन्हा सुरू करा.

6) महामंडळाचे सर्व परतावे ताबडतोब वाटप केले पाहिजे.

7) कुणबी प्रमाणपत्र दिलेले त्याची व्हॉलिडिटी द्या.

8) मराठा उपसमिती काही कामाची नाही, अध्यक्षाला काम नाही. उपसमिती बरखास्त करा.

9) स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा.

10) शिंदे समितीला मुदतवाढ देऊन रेकॉर्ड तपासायला लावा.

मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दोष देत नाही- मनोज जरांगे
मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दोष देत नाही. तुम्ही हैदराबादचा GR काढला पण तुम्ही प्रमाणपत्र का रोखले? फडणवीस तुम्हाला मंत्री मराठ्यांनीच केलंय. अधिकारी प्रमाणपत्र देत नाहीत, त्याला फडणवीस साहेबच जबाबदार आहेत. फडणवीस साहेबांनी विधानसभेत एक भाषण केलं होतं. मंत्र्यांना किंमत नाही, मुख्यमंत्रीय सर्वेसर्वा आहे. याचा अर्थ तुम्हीच प्रमाणपत्र रोखले आहे. फडणवीस साहेब, या गोरगरिबांची मने जिंका. तुमच्या 50 पिढ्या आल्या तरी मी मराठ्यांना धक्का लावू देणार नाही. फडणवीसांनी मराठवाड्यातील मराठ्यांना प्रमाणपत्रासाठी रोखू नये. आंदोलनाच्या तारखेच्या आता प्रमाणपत्र द्या, असं मनोज जरांगे म्हणाले.

Related Posts

टीकेच्या वादळानंतर प्रणित मोरेची माफी; जुन्या व्हिडिओंचीही होणार चौकशी.

मुंबई : कॉमेडियन प्रणित मोरे यांच्या शोमधील वादग्रस्त वक्तव्यांमुळे निर्माण झालेल्या वादानंतर त्यांनी सार्वजनिकरित्या माफी मागितली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही क्लिप्समुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली असून आता या…

जोरहाटमध्ये हवाई दलाचे AN-32 विमान कोसळले; 5 जवान शहीद

आसाम : आसाममधील जोरहाट हवाई तळावर भारतीय हवाई दलाच्या AN-32 मालवाहू विमानाचा शनिवारी भीषण अपघात झाला. लँडिंगदरम्यान हे विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याने हवाई दलाच्या पाच जवानांना वीरमरण आले, तर सहवैमानिक जखमी…