ठाणे. रेल्वे स्टेशन परिसरात मोठी दुर्घटना टळली असून ‘शिवशाही’ बसला लागलेल्या भीषण आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली. ठाणे स्टेशनवरील सेटीस ब्रिजवर ही घटना घडली. या घटनेमुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शिवशाही बस ठाण्याहून पालघरमार्गे बोईसरकडे जाणार होती. मात्र, ठाणे स्टेशनजवळ येताच बस अचानक बंद पडली. त्यानंतर बसच्या खालच्या भागातून, विशेषतः इंजिन आणि डिझेल टाकीजवळून धूर आणि नंतर ज्वाळा दिसू लागल्या. काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण केले आणि संपूर्ण बसला वेढा घातला.
बसला आग लागल्याचे लक्षात येताच बसमधील 15 प्रवाशांनी तत्काळ बाहेर धाव घेतली. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी पाण्याच्या जोरदार फवाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. स्थानिक नागरिकांनीही मदतीचा हात देत आग आटोक्यात आणण्यासाठी सहकार्य केले.
अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून अखेर आग नियंत्रणात आणली, मात्र तोपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती. घटनास्थळी बसचा फक्त सांगाडा शिल्लक राहिल्याचे दृश्य पाहायला मिळाले.
प्राथमिक तपासानुसार, बसला आग लागण्याचे कारण शॉर्ट सर्किट असावे, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, याबाबत अधिकृत तपास सुरू असून नेमके कारण पुढील चौकशीत स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे काही काळ वाहतूक आणि प्रवाशांचा खोळंबा झाला होता.


