आसाम : आसाममधील जोरहाट हवाई तळावर भारतीय हवाई दलाच्या AN-32 मालवाहू विमानाचा शनिवारी भीषण अपघात झाला. लँडिंगदरम्यान हे विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याने हवाई दलाच्या पाच जवानांना वीरमरण आले, तर सहवैमानिक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे 10 वाजता विमान जोरहाट एअरबेसवर उतरत असताना अचानक नियंत्रण सुटले. त्यानंतर विमान धावपट्टीजवळ कोसळले आणि त्याला आग लागली. अपघाताची तीव्रता इतकी होती की विमानाचे दोन तुकडे झाले. घटनेनंतर हवाई दलाच्या आपत्कालीन प्रतिसाद पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचाव आणि मदतकार्य सुरू केले.
या दुर्घटनेत स्क्वाड्रन लीडर प्रशांत सिंग, फ्लाइट लेफ्टनंट शुभम कुमार, सार्जंट जितेंद्र शर्मा, अग्निवीर एअर खेमाराम कुमावत आणि अग्निवीर एअर दानिश आलम यांचे निधन झाले. कर्तव्य बजावत असताना त्यांनी सर्वोच्च बलिदान दिल्याचे भारतीय हवाई दलाने म्हटले आहे.भारतीय हवाई दलाने सोशल मीडियावरील अधिकृत पोस्टद्वारे या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. तसेच शहीद जवानांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत या कठीण काळात हवाई दल त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले.
दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक माहितीनुसार, लँडिंगच्या वेळी विमानावरील नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी हवाई दलाने ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’चे आदेश दिले असून तज्ज्ञांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.


