रत्नागिरी : कोकणातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने मुंबई ते सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनिक एक्स्प्रेस सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांचा प्रवास अधिक सोपा होणार आहे.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान ही नवीन एक्स्प्रेस दररोज धावणार आहे. सुमारे ५१० किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या या गाडीमुळे कोकणातील चाकरमानी, व्यावसायिक, विद्यार्थी, रुग्ण आणि पर्यटकांना मोठा फायदा होणार आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी या गाडीला कोकण रेल्वे मार्गावरील २२ महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. यामध्ये दादर, ठाणे, पनवेल, पेन, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या स्थानकांचा समावेश आहे.
चाकरमान्यांचा प्रवास होणार सुकर
गणेशोत्सवासाठी मुंबई आणि परिसरातून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात येतात. सणासुदीच्या काळात रेल्वे गाड्यांवर मोठा ताण येतो. अशा परिस्थितीत नवीन दैनिक एक्स्प्रेसमुळे प्रवाशांना अतिरिक्त पर्याय उपलब्ध होणार आहे. सध्या कोकण मार्गावर प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. नवीन गाडीमुळे प्रवासाची सुविधा वाढणार असून, कोकणातील पर्यटन आणि स्थानिक व्यापारालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे. रेल्वे प्रशासनाकडून या गाडीचे वेळापत्रक आणि प्रत्यक्ष धावण्याची तारीख लवकरच जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.


