नागपूर : कळमेश्वर तालुक्यात प्रस्तावित थर्ड रिंग रोड (१२० मीटर बाह्य वळण रस्ता) प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा रोष उफाळून आला आहे. बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित मार्गदर्शन सभेत तालुक्यातील विविध गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या वडिलोपार्जित जमिनीबाबत तीव्र भावना व्यक्त करत “जमीन हीच आमच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे, कोणत्याही परिस्थितीत आम्ही जमीन देणार नाही,” अशी ठाम भूमिका मांडली.
सभेदरम्यान अनेक शेतकऱ्यांनी प्रस्तावित रस्त्यामुळे शेतीचे होणारे नुकसान, उपजीविकेवर होणारा परिणाम आणि भविष्यातील अनिश्चितता याबाबत चिंता व्यक्त केली. “आमच्या पिढ्यान् पिढ्यांची शेती एका निर्णयामुळे हिरावून घेतली जाऊ शकत नाही,” असे भावनिक उद्गारही काही शेतकऱ्यांनी काढले. शेतकऱ्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, जोपर्यंत एनएमआरडीए प्रशासन सर्व बाधित शेतकऱ्यांना एकत्र बोलावून प्रकल्पाची सविस्तर माहिती देत नाही, त्यांच्या शंकांचे निरसन करत नाही आणि त्यांना विश्वासात घेत नाही, तोपर्यंत कोणताही निर्णय स्वीकारला जाणार नाही.
सभेत कळमेश्वर पंचायत समितीचे माजी सभापती श्रावण भिंगारे, प्रगतिशील शेतकरी नरेश राऊत, कळमेश्वर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय धोंगडी, लोणारचे सरपंच आशिष डेहनकर, सुरेश बोधाणे, पोटे, सारंग झाडे, साहेबराव करडभाजणे आदींनी आपली मते मांडली. सर्व वक्त्यांनी शेतकऱ्यांनी एकजूट राखून आपला आवाज संघटितपणे मांडण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंकज घोंगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन माजी सभापती वैभव घोंगे यांनी मानले.


