महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून 12 मे 2026 रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची चढाओढ वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार अमोल मिटकरी यांचा कार्यकाळ संपत असून त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. रिक्त होणाऱ्या जागेसाठी जय पवार यांना संधी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. अजित पवार यांच्या नंतर पक्षाला एक विश्वासू आणि युवा चेहरा पुढे आणण्याची गरज असून जय पवार हे त्यासाठी योग्य उमेदवार असल्याचं मिटकरी यांनी म्हटलं आहे. काहींना हे घराणेशाही वाटू शकतं, मात्र भविष्यात महाराष्ट्रासाठी सक्षम नेतृत्व देण्याची क्षमता जय पवार यांच्यात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, विधान परिषदेतील उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, राजेश राठोड, प्रवीण दटके आणि रमेश कराड यांचा कार्यकाळ संपणार आहे. एका जागेसाठी 28 मतांचा कोटा आवश्यक असून महायुतीकडे संख्याबळ जास्त असल्यामुळे त्यांचे 8 उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे, तर महाविकास आघाडीला एकच जागा सहज मिळू शकते. निवडणुकीची अधिसूचना 23 एप्रिल रोजी जारी झाली असून 30 एप्रिल ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. 2 मे रोजी छाननी, 4 मे रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. मतदान 12 मे रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत होईल आणि त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी सुरू होईल. संपूर्ण प्रक्रिया 13 मे 2026 पर्यंत पूर्ण केली जाणार आहे.


