नवी दिल्ली : श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाच्या निवडीवर पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. युवा फलंदाज बी. साई सुदर्शनने दुखापतीमुळे मालिकेतून माघार घेतल्याने त्याच्या जागी कोणाला संधी मिळणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. या शर्यतीत मुंबईचा फलंदाज सर्फराज खान याचे नाव सध्या चर्चेत आहे.
साई सुदर्शनच्या पायाच्या बोटाला दुखापत झाली आहे. पूर्णपणे तंदुरुस्त न झाल्यामुळे त्याला श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला मुकावे लागणार आहे. साईला भारतीय संघात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळण्याची शक्यता होती. मात्र, दुखापतीमुळे त्याच्या जागी आता नव्या चेहऱ्याची निवड करावी लागणार आहे.
साई सुदर्शनची कामगिरी दमदार
२४ वर्षीय साई सुदर्शनने गेल्या काही काळात आपल्या फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आयपीएल २०२६ मध्ये गुजरात टायटन्सकडून खेळताना त्याने ७०० हून अधिक धावा केल्या. अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीतही त्याने पहिल्या डावात ८१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. इतकेच नाही, तर जुलैमध्ये श्रीलंका दौऱ्यावर भारत ‘अ’ संघाकडून खेळताना साईने श्रीलंका ‘अ’ विरुद्ध दोन सामन्यांमध्ये अनुक्रमे १३२ आणि १६८ धावांची शानदार खेळी केली होती. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, दुखापतीमुळे त्याला बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्येच थांबावे लागले आणि अखेर मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घ्यावा लागला.
साईच्या जागी सर्फराजला संधी?
साई सुदर्शनच्या जागी बीसीसीआय सर्फराज खानच्या नावाचा विचार करू शकते, अशी चर्चा सुरू आहे. सर्फराजने भारतासाठी आतापर्यंत सहा कसोटी सामने खेळले असून त्याच्या नावावर एक शतक आणि तीन अर्धशतकांसह ३७१ धावा आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मात्र सर्फराजचा रेकॉर्ड अधिक प्रभावी आहे. त्याने ६२ सामन्यांत १७ शतके आणि १६ अर्धशतकांसह ५,११४ धावा केल्या आहेत. भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी तो फिटनेसवरही मेहनत घेत आहे. सर्फराजने २०२४ मध्ये भारतासाठी अखेरचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर राष्ट्रीय संघातील त्याची अनुपस्थिती सातत्याने चर्चेचा विषय ठरली.
एका पोस्टमुळे वाढली चर्चा
राष्ट्रीय संघात निवड न झाल्याच्या पार्श्वभूमीवर सर्फराजने अलीकडेच इंस्टाग्राम स्टोरीवर २०१९ मधील तेलुगू चित्रपट ‘जर्सी’ मधील एक स्टिल शेअर केला होता. त्यासोबत त्याने लिहिले होते, “मी कदाचित जुळवून घेऊ शकणार नाही, पण मी माझ्या सर्व शक्तीनिशी लढेन.” सर्फराजच्या या पोस्टचा संबंध त्याच्या टीम इंडियातील निवडीशी जोडला गेला. आता साई सुदर्शनच्या माघारीनंतर त्याचे नाव पुन्हा चर्चेत आल्याने या पोस्टचीही सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
निवड झाली तरी प्लेइंग-11 कठीण?
सर्फराज खानची रिप्लेसमेंट म्हणून निवड झाली, तरी त्याला थेट प्लेइंग-11 मध्ये संधी मिळेलच असे नाही. कारण साईच्या अनुपस्थितीत देवदत्त पडिक्कलने सराव सामन्यात शतक झळकावत आपला दावा मजबूत केला आहे. त्यामुळे संघात स्थान मिळवण्यासाठी सर्फराज आणि पडिक्कल यांच्यातील स्पर्धा पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. अखेर निवड समिती कोणावर विश्वास दाखवते आणि सर्फराजला पुन्हा टीम इंडियाची जर्सी मिळते का, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.


