मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आणि दिलासादायक घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी पंपांवरील ४८ हजार कोटी रुपयांचे जुने वीजबिल माफ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपांना भर दिवसा मोफत वीज देण्याच्या योजनेसोबतच ही कर्जमुक्ती शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही घोषणा केली. भाजप किसान मोर्चाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, “कोणतीही निवडणूक डोळ्यांसमोर नसताना आम्ही हा निर्णय घेतला. शेतकऱ्यांचे हित हा आमच्यासाठी राजकारणाचा विषय नाही. शेतकऱ्यांची पाटी कोरी झाली पाहिजे आणि त्याला नव्याने इतिहास लिहिता आला पाहिजे, या भावनेतून हा निर्णय घेतला आहे.”
भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतुक करताना म्हटले की, “देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांच्या सुखदुःखात पाठीशी उभे राहणारे नेतृत्व आहे.” जलयुक्त शिवार अभियान, शेतरस्ते-पाणंद रस्ते, शेतीत AI आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, तसेच कृषी पंपांना मोफत वीज अशा विविध योजनांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत असल्याचेही त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्णयाचे स्वागत केले. भाजप प्रदेश सरचिटणीस संजय कुटे यांनी शेतकऱ्यांच्या वतीने अभिनंदनाचा ठराव मांडला, तर उपस्थितांनी हात उंचावून जयघोष केला.
या सोहळ्यास कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, भाजप किसान मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस अनिल बोंडे, आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रवीण दरेकर, चित्रा वाघ, रामकृष्ण वेताळ यांच्यासह अनेक आमदार, पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.
थोडक्यात :
– ४८ हजार कोटींचे कृषी पंपांचे जुने वीजबिल माफ
– ७.५ HP पर्यंतच्या पंपांना भर दिवसा मोफत वीज
– लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा
– महायुती सरकारचा शेतकरी हिताचा महत्त्वाचा निर्णय


