देशात स्वच्छ आणि पर्यावरणपूरक इंधनाचा वापर वाढवण्यासाठी केंद्र सरकार मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचा वापर वाढवल्यानंतर आता घरगुती स्वयंपाकासाठीही एथेनॉलचा वापर सुरू करण्याची योजना सरकारच्या विचाराधीन आहे. यासाठी इथेनॉलवर चालणाऱ्या स्टोव्हना प्रोत्साहन देण्यासाठी सबसिडी देण्याचाही विचार सुरू असल्याचे वृत्त आहे.
सध्या देशात बहुतांश घरांमध्ये LPG गॅसचा वापर केला जातो. मात्र, वाढती मागणी आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकार पर्यायी इंधनाचा शोध घेत आहे. अशा परिस्थितीत एथेनॉल हा एक प्रभावी पर्याय ठरू शकतो, असा तज्ज्ञांचा विश्वास आहे. एथेनॉल हे ऊस, धान्य आणि इतर साखरयुक्त पिकांपासून तयार होणारे जैवइंधन आहे. गेल्या काही वर्षांत भारतात एथेनॉल उत्पादनात मोठी वाढ झाली असून, सध्या वार्षिक उत्पादन क्षमता २० अब्ज लिटरपेक्षा अधिक आहे. यावर्षी त्यात आणखी वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचा वापर सुरू असला तरी उत्पादन मोठ्या प्रमाणात उपलब्ध राहत आहे. त्यामुळे या अतिरिक्त एथेनॉलचा वापर घरगुती स्वयंपाकासाठी करण्याचा पर्याय सरकार तपासत आहे. यासाठी तेल विपणन कंपन्यांकडून एथेनॉलवर चालणाऱ्या स्टोव्हची चाचणी आणि संशोधन सुरू असल्याची माहिती आहे. तसेच भविष्यात पेट्रोल पंपांवर विशेष ‘एथेनॉल एटीएम’ उभारून नागरिकांना एथेनॉल सहज उपलब्ध करून देण्याची संकल्पनाही चर्चेत आहे.
तज्ज्ञांच्या मते, ही योजना प्रत्यक्षात आली तर LPGवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल. तसेच इंधन आयात खर्चात बचत होऊन देशाच्या ऊर्जा सुरक्षिततेलाही बळकटी मिळू शकते. मात्र, या योजनेबाबत केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे सबसिडी, अंमलबजावणीची पद्धत आणि वापराचे नियम याबाबत अंतिम धोरण जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट चित्र समोर येणार आहे.


