मुंबई : शाळेत मुलांना मिळणाऱ्या अन्नाच्या गुणवत्तेबाबत पालकांमध्ये कायमच चिंता व्यक्त केली जाते. याच पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने राज्यभरातील खासगी शाळांमधील कँटीन, उपहारगृहे आणि मध्यान्ह भोजन व्यवस्थेची विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. विद्यार्थ्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि पौष्टिक अन्न मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क असल्याचे स्पष्ट करत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कोणतीही निष्काळजीपणा सहन केली जाणार नाही, असा इशारा दिला आहे.
या मोहिमेत शाळांमधील स्वयंपाकघरांची स्वच्छता, अन्नसाठवणूक पद्धती, तयार होणाऱ्या अन्नाची गुणवत्ता तसेच कर्मचाऱ्यांची वैयक्तिक स्वच्छता यांची सखोल तपासणी केली जाणार आहे. मुंबईत शिक्षण विभागाचे अधिकारी, मुख्याध्यापक आणि मध्यान्ह भोजन पुरवठादार संस्थांच्या प्रतिनिधींशी बैठक घेऊन अन्नसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, शिळे, निकृष्ट किंवा मुदतबाह्य अन्नपदार्थ वापरणे, स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे किंवा अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणे आढळल्यास संबंधित शाळा, कँटीन चालक आणि भोजन पुरवठादारांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
शाळांसाठी काही महत्त्वाच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये स्वयंपाकघर आणि कँटीन परिसर स्वच्छ ठेवणे, FSSAI च्या नियमांचे पालन करणे, अन्न झाकून योग्य तापमानात साठवणे, स्वच्छ पिण्याचे पाणी वापरणे आणि मध्यान्ह भोजनाची नियमित गुणवत्ता तपासणी करणे यांचा समावेश आहे. अन्नातील भेसळ, निकृष्ट दर्जाचे अन्न किंवा अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्यास नागरिकांना १८००२२२३६५ या टोल-फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाच्या या मोहिमेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळांमधील अन्न व्यवस्थेवर अधिक प्रभावी नियंत्रण येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


