मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पावसाने थोडी उसंत दिली असली, तरी मुंबईकरांची चिंता मात्र संपलेली नाही. कारण आता धोका पावसाचा नसून समुद्राच्या वाढत्या भरतीचा आहे. मुंबई महानगरपालिकेने १४ जुलै ते १८ जुलै २०२६ या कालावधीत समुद्राला मोठी भरती येणार असल्याचा इशारा दिला असून नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले आहे.
जुलैच्या सुरुवातीला मुसळधार पावसाने मुंबईकरांची चांगलीच दमछाक केली होती. त्यानंतर हवामानात थोडी उसंत मिळाल्याने अनेक जण समुद्रकिनाऱ्यांकडे वळत आहेत. मात्र, याच काळात समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता वाढल्याने बीएमसीने सतर्कतेचा इशारा दिला आहे. महापालिकेच्या माहितीनुसार, १६ जुलै रोजी दुपारी १.३६ वाजता सर्वाधिक ४.८९ मीटर उंच भरती येण्याचा अंदाज आहे. याशिवाय १५ जुलैला ४.८५ मीटर, १७ जुलैला ४.८३ मीटर आणि १८ जुलैला ४.६६ मीटर उंच लाटा उसळू शकतात.
बीएमसीने विशेषतः गिरगाव चौपाटी, जुहू, दादर, वर्सोवा आणि इतर किनारी भागात जाणाऱ्या नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. भरतीच्या काळात समुद्राच्या जवळ जाणे, सेल्फी काढण्यासाठी पुढे सरकणे किंवा लाटांजवळ थांबणे टाळावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबई पोलीस आणि महापालिकेकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, हवामान अभ्यासक अश्रेय शेट्टी यांच्या माहितीनुसार राज्यात मान्सून पुन्हा २० जुलैनंतर सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस मुंबईत जोरदार पावसाची शक्यता कमी असून वातावरण तुलनेने कोरडे राहू शकते. मुंबईकरांसाठी हा आठवडा पावसापेक्षा समुद्राच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचा आहे. किनाऱ्यावर फिरायला जाण्याचा मोह टाळून सुरक्षिततेला प्राधान्य देणे, हेच पुढील काही दिवस महत्त्वाचे ठरणार आहे.


