आज १ जुलै म्हणजे कृषी दिन. राज्याचे माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस शेती आणि शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पाळला जातो. शेतकरी, जो अन्नदाता आहे, बळीराजा आहे, त्याचा हा दिवस. वर्षभर तो सगळ्यांचे पोट भरतो. त्याच्या मालाला बाजारात भाव कितीही असो, तो आम्हा लोकांना अन्नाचे दान देतो. इतकं करूनही कोण ओळखतो हो त्याला? देशाचा राजा आहे तो, पण आपण तो मान देतो का त्याला? हा मोठा प्रश्नच आहे.
पावसाळ्याचे दिवस आले की त्याने आस लावावी. जमिनीत पावसाचे थेंब पडले की मग पेरणीची लगबग चालावी. मग त्या रानात त्याने राब, राब, राबावं. मग डुलत मातीवर ते पीक यावं, हिरवं गच्च भरलेलं रान दिसावं. मग काही दिवसांत ते पीक काढणीला यावं, मग घरही त्याच मालाने गच्च भरावं. इतकी साधी अपेक्षा त्याची. पण कित्येक शेतकऱ्यांची ती अपेक्षाही पूर्ण होत नाही. कधी पाऊस नाही, कधी जास्त पाऊस, पाहिजे तसं बियाणं नाही, आणि सगळं करून पीक आलंच तर मालाला भाव नाही.
आज जग खूप पुढे जात आहे, मग शेती आणि शेतकरी तिथेच का आहेत?
आज ॲग्रिकल्चर ही एक प्रोफेशनल डिग्री आहे, मग आपली शेती त्या स्तरावर का नाही?
आजच्या जगात शेतकरी आणि त्याची शेती त्या स्तरावर जायलाच हवी.
अन्नदात्याला त्याची जागा मिळायलाच हवी.
त्याला त्याच्या हक्काचे पैसे, त्याच्या मालाला योग्य भाव मिळायलाच हवा.
आज ॲग्रिकल्चरचं शिक्षण सुरू आहे. कित्येक कृषी विद्यापीठे उभारलेली आहेत. कित्येक विद्यार्थी त्यात शिकतही आहेत, शेतीचे प्रशिक्षण घेत आहेत. इतकं असूनही शेती करण्याचा विचार कोणाचाच नाही.कृषी शिक्षण घेणारे विद्यार्थीच शेतीला नाकारणार असतील, तर शेती करणार कोण? आज शेतकऱ्यालाही वाटतं की माझा मुलगा शेतकरी व्हायला नको, त्याला नोकरी हवी. आम्ही कृषी शिक्षण घेणारे विद्यार्थी ते शिक्षण नोकरीसाठी घेतो, मग शेती करायची कोणी?
असो, यात एक आशेचा किरण म्हणजे या देशात नोकरी सोडून शेतीकडे पावलं वळवणारे युवकदेखील आहेत. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून, कमी जागेत पीक घेत आहेत. काहीतरी नवीन करणारे नवीन शेतकरीसुद्धा आहेत. नवीन तंत्रज्ञानासोबत नवीन शेतीची सुरुवात आहे. सध्या कमी प्रमाणात असले तरी हळूहळू स्वतःला शेतकरी म्हणून घेणाऱ्या लोकांची संख्या वाढेल, हीच आशा आहे.🌾🌾
–कृष्णाई देशमुख
एमएससी ॲग्री


