नांदेड, रवींद्र ओंढेकर ( प्रतिनिधी ) : सेवानिवृत्तीनंतरही सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांना आरोग्य सुरक्षा कवच मिळवून देण्यासाठी कार्यरत असलेल्या टीम आयुष्मान भारत नांदेडच्या कार्याचे औरंगाबादचे आमदार सतीश चव्हाण यांनी कौतुक करून अभिनंदन केले. वैद्य रुग्णालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान आयुष्मान भारत व वय वंदना कार्ड काढण्याचे शिबिर सुरू असल्याचे पाहून त्यांनी या उपक्रमाची माहिती जाणून घेतली. या कार्याने प्रभावित झालेल्या आ. चव्हाण यांच्या हस्ते टीममधील सदस्यांचा गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
१३ सप्टेंबर रोजी वैद्य रुग्णालयात हा कार्यक्रम झाला. उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग फेस्कॉम, नांदेडच्या वतीने आ. सतीश चव्हाण यांना टीम आयुष्मान भारतच्या कार्याची सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी फेस्कॉम नांदेडचे अध्यक्ष डॉ. हंसराज वैद्य यांच्या उपस्थितीत टीमचा गौरव करण्यात आला. डॉ. हंसराज वैद्य यांनी सांगितले की, टीम आयुष्मान भारत नांदेडच्या माध्यमातून आतापर्यंत पाच हजारांपेक्षा अधिक, जवळपास सहा हजार नागरिकांना आयुष्मान भारत व वय वंदना कार्ड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या माध्यमातून नागरिकांना सुमारे २५० कोटी रुपयांपेक्षा अधिक आरोग्य सुरक्षा कवच मिळण्यास मदत झाली आहे. सेवानिवृत्तीनंतरही समाजासाठी काहीतरी योगदान देता येते, याचा आदर्श वीज मंडळातून अभियंता म्हणून निवृत्त झालेले इंजि. प्रकाश पत्तेवार, इंजि. वामन गाजरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निर्माण केला आहे, असे त्यांनी नमूद केले.
या उपक्रमात इंजि. पद्मजा आलूरकर, रश्मी वडवळकर, डॉ. हृदयकुमार कौरवार, इंजि. प्रकाश पईतवार, डॉ. सुरेश येवतीकर आणि विठ्ठल बिडवई यांचेही योगदान आहे. दरम्यान, टीम आयुष्मान भारतचे प्रमुख इंजि. प्रकाश पत्तेवार यांनी नागरिकांना आयुष्मान कार्ड काढून देण्यासाठी वैद्य रुग्णालय प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या रविवारी उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ. हंसराज वैद्य यांचे आभार मानले. या उपक्रमामुळे गरजू नागरिकांना आरोग्य योजनांचा लाभ मिळविण्यासाठी मोठी मदत होत आहे. कार्यक्रमास फेस्कॉम नांदेडचे सचिव प्रभाकर कुंटूरकर, कोषाध्यक्ष गिरीश बाराळे, महिला विभागाच्या अध्यक्ष डॉ. लक्ष्मी पुरण शेट्टीवार, प्रा. जांभरुणकर तसेच आयुष्मान भारत योजनेची लाभार्थी आदिवासी ज्येष्ठ विधवा महिला यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


