अमरावती, राज माहोरे ( प्रतिनिधी ) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) औषध निरीक्षक भरती परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणामुळे संतप्त झालेल्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी गुरुवारी अमरावतीत जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य जनआक्रोश मोर्चा काढला. यावेळी शासन आणि आयोगाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली.
विद्यार्थी कृती समितीच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने स्पर्धा परीक्षा विद्यार्थी सहभागी झाले होते. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासन आणि एमपीएससी आयोगाला निवेदन देण्यात आले. गेल्या काही वर्षांत विविध भरती आणि स्पर्धा परीक्षांमध्ये गैरव्यवहाराच्या घटना समोर येत असल्याने विद्यार्थ्यांचा आयोगावरील विश्वास डळमळीत झाला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. लाखो युवक रात्रंदिवस अभ्यास करून परीक्षांची तयारी करतात. मात्र, पेपरफुटीसारख्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचे कष्ट, वेळ आणि आर्थिक नुकसान होत असल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली. पेपरफुटी प्रकरणातील सर्व दोषी आणि सहआरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी, प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, कोरोना काळानंतर झालेल्या सर्व भरती परीक्षांची स्वतंत्र चौकशी करावी, भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची आयोगाने हमी द्यावी, तसेच भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी राज्य शासनाने कठोर कायदा मंजूर करावा, अशा प्रमुख मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या.
‘पेपरफुटी हा केवळ गैरव्यवहार नसून लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर घाला आहे,’ अशी संतप्त प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. शासनाने याप्रकरणी तातडीने ठोस निर्णय घेतला नाही, तर राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. या जनआक्रोश मोर्चाच्या आयोजनामध्ये मिलिंद लाहे, अजय यावले, अंकुश कडू, प्रवीण निपणे, आशीष भाकरे, राहुल फाटे, सचिन वानखडे आणि सागर भस्मे यांचे विशेष योगदान असल्याचे आंदोलकांनी सांगितले. न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. अजय यावले म्हणाले, “जोपर्यंत पेपरफुटी प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई होत नाही आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील. हा संघर्ष कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून भ्रष्ट व्यवस्थेविरोधात आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही माफी दिली जाणार नाही.”


