नांदेड, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : समृद्धी महामार्ग प्रकल्पांतर्गत नांदेड शहरातील वाजेगाव ते बाफना टी-पॉइंट दरम्यान सुरू असलेल्या पुलाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी महानगरपालिकेत महापौर सौ. कविता संतोष मुळे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. पुलाचे बांधकाम सुरू असताना नागरिक व वाहनधारकांना अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी आवश्यक उपाययोजना आणि खबरदारीबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
पुलाच्या बांधकामामुळे वाहतुकीवर परिणाम होऊ नये, यासाठी पर्यायी मार्गांचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या. तसेच बांधकाम परिसरात दिशादर्शक फलक व बॅरिकेड्स लावणे, रात्रीच्या वेळी पुरेशी प्रकाश व्यवस्था ठेवणे आणि धुळीचा नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले. या बैठकीस उपमहापौर दिपकसिंह रावत, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त स. अजितपालसिंघ संधु, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता रामदास खलसे, कंत्राटदार कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर लॅवेंडर सिंग सिरोही, अथॉरिटी इंजिनियर देशमाने यांच्यासह नगरसेवक आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पुलाच्या कामासाठी समन्वय समिती
पुलाच्या कामात विविध विभागांमध्ये समन्वय राहावा यासाठी विशेष ‘समन्वय समिती’ स्थापन करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या. या समितीत महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी, स्थानिक नगरसेवक, पोलीस प्रशासन आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांचा समावेश करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच पुढील आठ दिवसांत पुलाच्या संपूर्ण कामाचे नियोजन आणि रूपरेषा पीपीटीच्या माध्यमातून सादर करण्याचे आदेश देण्यात आले. पीपीटी सादरीकरणानंतर सर्व संबंधित विभागांचे अधिकारी आणि समिती सदस्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी संयुक्त पाहणी करावी, जेणेकरून प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेता येतील, असे महापौरांनी स्पष्ट केले.
एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी पुलाच्या कामाची सद्यस्थिती व प्रगतीची माहिती बैठकीत दिली. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या सुरक्षा उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल, अशी ग्वाहीही यावेळी देण्यात आली. महानगरपालिका आणि एमएसआरडीसीच्या समन्वयातून पुलाचे काम सुरक्षित आणि वेळेत पूर्ण करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.


