मुंबई , गोविंद येतयेकर ( माध्यम प्रमुख ) : काँग्रेसच्या काळात आश्रमशाळा काँग्रेस नेत्यांना आंदण देण्यात आल्या. भ्रष्टाचाराचे कुरण म्हणूनच आदिवासी शाळांचे वाटप काँग्रेसच्या काळात झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट दिसते. सर्वाधिक आश्रमशाळा काँग्रेस नेत्यांच्या असून, त्या शाळांच्या अनुदानातून कमिशन खाण्याचा घाट घातल्याचे लक्षात आल्याने सरकारने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे, असा आरोप भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मंगळवारी केला.
आदिवासी विभागात सर्वाधिक भ्रष्टाचार असल्याचा आरोप करणाऱ्या संजय राऊत यांनी सर्पदंशामुळे तीन मुलींचा मृत्यू झाल्याप्रकरणी काँग्रेसच्या माजी खासदाराला जाब का विचारला नाही, असा सवालही बन यांनी उपस्थित केला. विद्यार्थ्यांना त्यांचा हक्क देण्याचे काम राज्य सरकार करत आहे. मात्र, मधले संस्थाचालक आणि काँग्रेसचे दलाल विद्यार्थ्यांचा हक्क हिरावून स्वतःची घरे भरत आहेत. पुण्यात विद्यार्थी आंदोलन करत आहेत, तर गडचिरोलीत विद्यार्थ्यांचा सर्पदंशामुळे मृत्यू होत आहे. संस्थाचालकांमध्ये मोठ्या प्रमाणावर काँग्रेसशी संबंधित व्यक्ती असल्याचा आरोप करत, सरकारकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानात भ्रष्टाचार करण्याचे काम काँग्रेसचे नेते करत असल्याचे बन यांनी म्हटले. आदिवासी विद्यार्थ्यांच्या अनुदानातून कमिशन घ्यायचे आणि त्यातून काँग्रेसचे कार्यक्रम करायचे, हेच काँग्रेसचे धोरण असल्याचा आरोप करत राहुल गांधी यांनी आधी काँग्रेस नेत्यांच्या आश्रमशाळांमध्ये नेमके काय चालले आहे, याचे उत्तर शोधावे, असेही बन यांनी सुनावले.
कुठल्याही मंत्र्याच्या जावयाला एकही कंत्राट दिले नसल्याचे ठणकावून सांगत बन म्हणाले की, संजय राऊत यांच्याकडे याबाबत पुरावे असतील तर त्यांनी ते सादर करावेत. उलट कोविडकाळात मुंबईच्या तत्कालीन महापौरांच्या मुलाला आणि जावयाला कोणत्या पद्धतीने कंत्राटे देण्यात आली होती, तसेच खिचडी प्रकरणात किती टक्के घोटाळा झाला, याचा इतिहास महाराष्ट्राला माहिती आहे, असा पलटवार त्यांनी केला. शाळांची स्थिती सुधारली पाहिजे, या मताशी आम्ही सर्व सहमत आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यानंतर ग्रामीण भागातील शाळांची स्थिती सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील शाळांना पक्क्या इमारती, चांगले रस्ते, वीज, संगणक यांसह विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सरकारच्या वतीने केले जात आहे. काही ठिकाणी अडचणी येतात; मात्र त्या सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे बन यांनी स्पष्ट केले.
मतांसाठी राऊतांचा कुंभमेळ्याला विरोध
हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने लाखो हिंदू एकत्र येणार आहेत आणि तेच संजय राऊतांना नको आहे, असा आरोपही नवनाथ बन यांनी केला. याच ठिकाणी इज्तेमा आयोजित करण्यात आला असता आणि सरकारने मदत केली असती, तर त्याचे स्वागत केले असते. नमाज पठणाची स्पर्धा घेतली असती तर त्याला उत्साहाने पाठिंबा दिला असता. कुंभमेळ्याला लक्ष्य करायचे आणि औरंगजेब फॅन क्लब चालवायचा, हे उबाठा गट, काँग्रेस आणि राहुल गांधी यांचे धोरण असल्याची टीका बन यांनी केली.
बारा वर्षांनंतर हिंदू कुंभमेळ्यात एकत्र येत आहेत. या कुंभमेळ्याचे आम्ही मोठ्या थाटात आणि उत्साहात स्वागत करणार आहोत. मतांसाठी कितीही लांगूलचालन केले, तरी त्याचा काहीही फरक पडणार नाही. कुंभमेळ्यात देशभरातून हिंदू नागरिक येतील. त्यांना सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यांची व्यवस्था करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. त्यासाठीच कुंभमेळ्याचा खर्च केला जात असल्याचे नवनाथ बन यांनी स्पष्ट केले.


