राज्य सरकारच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’ अंतर्गत कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाली असली, तरी अनेक शेतकऱ्यांसमोर नव्याच अडचणी उभ्या राहिल्या आहेत. गावनिहाय जाहीर होत असलेल्या पात्र याद्यांमध्ये नाव, आडनाव आणि गावाच्या माहितीतील त्रुटी मोठ्या प्रमाणात आढळत असून, दुसरीकडे आधार प्रमाणीकरण (Aadhaar Authentication) पूर्ण केल्याशिवाय कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा होणार नसल्याचे सहकार विभागाने स्पष्ट केले आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अद्याप सर्व पात्र शेतकऱ्यांची नावे याद्यांमध्ये आलेली नाहीत. सोलापूर जिल्ह्यात अडीच लाख पात्र शेतकरी असताना आतापर्यंत केवळ २६ हजार शेतकऱ्यांचीच यादी प्रसिद्ध झाली आहे. विदर्भ, मराठवाड्यासह इतर भागांतही अशीच परिस्थिती असून, आधार बँक खात्याशी लिंक नसणे किंवा नावातील स्पेलिंगच्या चुका यामुळे अनेकांची प्रक्रिया रखडली आहे. याद्यांमधील गोंधळामुळे काही ठिकाणी एका गावातील शेतकऱ्याचे नाव दुसऱ्याच गावाच्या यादीत दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी आणि बँक प्रशासन दोघांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, सहकार विभागाने पात्र शेतकऱ्यांना तातडीने जवळच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रात’ जाऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. हे प्रमाणीकरण न झाल्यास कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा होणार नाही. ज्या शेतकऱ्यांचे नाव प्राथमिक यादीत आलेले नाही, त्यांनीही निराश होण्याची गरज नाही. त्यांनी सेवा केंद्रात जाऊन आधार क्रमांकाच्या माध्यमातून आपल्या पात्रतेची ऑनलाइन पडताळणी करून घ्यावी. तसेच ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय किंवा संबंधित बँकेत जाऊन यादीतील नाव, बँक खात्याची माहिती आणि कर्जाची नोंद अचूक असल्याची खात्री करून घ्यावी. सध्या केवळ पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील याद्या जाहीर झाल्या असून, उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्या टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध केल्या जाणार असल्याचे सहकार विभागाने सांगितले आहे.


