नागपूर, मोहन जाधव ( प्रतिनिधी ) : आधुनिक तंत्रज्ञान, बदलती जीवनशैली आणि जागतिकीकरणामुळे जग झपाट्याने बदलत आहे. या बदलांच्या प्रवाहात संस्कृतीची मूल्ये, कुटुंबव्यवस्था आणि नैतिकतेची जपणूक करणे अधिक महत्त्वाचे झाले आहे. सनातन विचार म्हणजे केवळ परंपरा नव्हे, तर संयम, सहिष्णुता आणि ‘वसुधैव कुटुंबकम्’ यांसारख्या जीवनमूल्यांचा स्वीकार होय, असे प्रतिपादन प्रसिद्ध प्रवचनकार मकरंदबुवा हरदास यांनी केले.
रेशीमबाग येथे सनातन सांस्कृतिक, कला व क्रीडा परिषदेचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी ते बोलत होते. भारतीय संस्कृतीने हजारो वर्षांपासून ‘सर्वे भवन्तु सुखिनः’ हा व्यापक मानवकल्याणाचा विचार जगाला दिला आहे. आजच्या तणावपूर्ण आणि स्पर्धात्मक वातावरणात या मूल्यांची गरज अधिक प्रकर्षाने जाणवत आहे. मुलांना केवळ आधुनिक शिक्षण देणे पुरेसे नसून, त्यांच्या मनात संस्कार, संवेदनशीलता, कर्तव्यभावना आणि आपल्या संस्कृती व मातीशी जोडलेपण निर्माण करणे आवश्यक आहे, असेही हरदास यांनी सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर सामूहिक रुद्राभिषेकाचे आयोजन करण्यात आले. तसेच संस्कार भारतीच्या संयुक्त विद्यमाने कृष्ण रूप सज्जा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत तीन गटांमध्ये तब्बल ८३ मुला-मुलींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यानंतर ‘महाभारतातील श्रीकृष्ण’ या विषयावर मकरंदबुवा हरदास यांचे विशेष व्याख्यान झाले. श्रीकृष्णाच्या व्यक्तिमत्त्वातील नेतृत्व, कर्तव्य, नीती आणि जीवनदृष्टी यांचा संदर्भ देत त्यांनी भारतीय संस्कृतीतील मूल्यांचे महत्त्व उपस्थितांसमोर मांडले.
कार्यक्रमाला संस्कार भारती विदर्भ प्रांत अध्यक्ष सौ. कांचन गडकरी, नगरसेविका मानसी नितीन सिमले, सुप्रसिद्ध उद्योजक जयंत खळतकर, सक्षमचे डॉ. मिलिंद हरदास, भाग संघचालक अशोक बुजोणे, किशोरजी धाराशिवकर, सुनीलजी काशीकर, प्रकाश देशपांडे, अॅड. रमण सेनाड, राजनजी पाठक तसेच विदर्भ प्रांत सहमंत्री गजानन रानडे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी साहित्य परिषदेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश एदलबादकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निशांत अग्निहोत्री यांनी केले. सूत्रसंचालन अभिजित मुळे यांनी, तर आभार प्रदर्शन सुधीर सांगोळे यांनी केले. भारतीय संस्कृती, कला, क्रीडा आणि संस्कारांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने परिषदेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


