अमरावती, राज माहोरे ( प्रतिनिधी ) : मोर्शी आणि चांदूरबाजार तालुक्यात दहशत निर्माण करून चार नागरिकांचा बळी घेणाऱ्या वाघिणीला वन विभागाने जेरबंद केले. मात्र, उपचारासाठी नेत असताना वाघिणीचा मृत्यू झाल्याने आता या प्रकरणावरून वाद निर्माण झाला आहे. वाघिणीच्या मृत्यूचा निषेध करण्यासाठी वन्यजीवप्रेमींनी मुंडन आंदोलन करत वन विभागाविरोधात संताप व्यक्त केला.
वर्धा आणि अमरावती जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या या वाघिणीचा शोध घेण्यासाठी वन विभागाकडून गेल्या अनेक दिवसांपासून मोहीम सुरू होती. अखेर चांदूरबाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा शिवारात वन विभागाच्या पथकाने ट्रँक्विलायझर गनच्या साहाय्याने वाघिणीला बेशुद्ध करून जेरबंद केले.मात्र, जेरबंद केल्यानंतर उपचारासाठी वन्यजीव बचाव केंद्राकडे नेत असतानाच तिचा मृत्यू झाला. यामुळे वन्यजीवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. वाघिणीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, ट्रँक्विलायझेशन प्रक्रियेत आवश्यक खबरदारी घेण्यात आली होती का, औषधाचा डोस योग्य होता का, असे सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. ट्रँक्विलायझेशनदरम्यान प्रमाणापेक्षा अधिक डोस दिल्यामुळे वाघिणीचा मृत्यू झाला का, असा संशय वन्यजीवप्रेमींनी व्यक्त केला आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन आणि अधिकृत चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.
या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. चौकशीत दोष आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणीही करण्यात आली. नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाल्यानंतर वाघिणीला जेरबंद करणे आवश्यक होते. मात्र, त्यानंतर तिची सुरक्षित हाताळणी आणि उपचार याबाबतही तितकीच गंभीरता अपेक्षित होती, असे वन्यजीवप्रेमींनी म्हटले आहे. चौकशी पारदर्शकपणे न झाल्यास न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.


