नागपूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील 1 लाखांहून अधिक महिलांच्या अर्जांची छाननी सुरू असून त्यापैकी अनेक महिला योजनेसाठी अपात्र ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुढील हप्ते मिळणार की नाही, याबाबत लाभार्थींमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्य सरकारने योजनेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी सर्व लाभार्थींना ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक केले होते. मात्र, अनेक महिलांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नसल्याचे समोर आले आहे. प्रशासनाने याबाबत कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.तपासणीदरम्यान काही लाभार्थींनी चुकीची माहिती सादर केल्याचेही आढळून आले आहे. उत्पन्नाबाबत चुकीचे तपशील देणे, पात्रतेच्या अटी लपवणे किंवा इतर निकषांचे उल्लंघन केल्याची प्रकरणे समोर आली आहेत. यासाठी शासनाने आयकर विभाग आणि आरटीओच्या माहितीचा आधार घेत पडताळणी केली आहे.ज्या कुटुंबातील सदस्य आयकरदाते आहेत किंवा ज्यांच्या नावावर चारचाकी वाहने आहेत, अशा महिलांना योजनेच्या नियमांनुसार अपात्र ठरवण्यात येत आहे. त्यामुळे अशा लाभार्थ्यांचे नाव योजनेतून वगळले जाऊ शकते. याशिवाय, चुकीची माहिती देऊन लाभ घेतल्याचे सिद्ध झाल्यास संबंधितांकडून मिळालेल्या रकमेची वसुलीही केली जाऊ शकते. दुसरीकडे, काही पात्र महिलांना तांत्रिक अडचणींमुळे अद्याप एकही हप्ता मिळालेला नाही. अशा अर्जांची फेरतपासणी केली जाणार असून पात्रता सिद्ध झाल्यास त्यांना थकीत लाभ मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, प्रशासनाने लाभार्थींना ई-केवायसी आणि अर्जातील माहितीची खात्री करून घेण्याचे आवाहन केले आहे. कारण नियमांचे पालन न करणाऱ्या महिलांसाठी योजनेचे दरवाजे आता जवळपास बंद होत असल्याचे चित्र दिसत आहे.


