मराठा-कुणबी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; ‘सारथी’ची परदेशी शिष्यवृत्ती आता पूर्ण खर्च उचलणार

पुणे : परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मराठा आणि कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. ‘छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था’ (सारथी) यांच्या परदेशी शिष्यवृत्ती योजनेत महत्त्वाचा बदल करण्यात आला असून, शैक्षणिक शुल्कावरील कमाल मर्यादा हटविण्यात आली आहे. त्यामुळे ही योजना आता पूर्णपणे अनुदानित स्वरूपात राबविण्यात येणार आहे.
यापूर्वी या योजनेअंतर्गत पदव्युत्तर शिक्षणासाठी ३० लाख रुपये आणि पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी ४० लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जात होती. मात्र, जगातील अनेक नामांकित विद्यापीठांचे शुल्क या मर्यादेपेक्षा अधिक असल्याने उर्वरित खर्च विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांना करावा लागत होता. परिणामी, अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे परदेशी शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करता येत नव्हते.
नव्या निर्णयानुसार, विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क, राहणीमानाचा खर्च तसेच निर्वाह भत्ता यांचा खर्चही ‘सारथी’ संस्थेकडून देण्यात येणार आहे. त्यामुळे परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांवरील आर्थिक ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. ‘महाराजा सयाजीराव गायकवाड–सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना’ अंतर्गत हा बदल करण्यात आला असून, योजनेची जाहिरातही नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांमध्ये या निर्णयाचे स्वागत होत असून, केवळ शिक्षण शुल्कच नव्हे तर राहणीमान आणि विम्यासारख्या खर्चांचाही समावेश केल्यामुळे आता शिक्षणावर अधिक लक्ष केंद्रित करता येणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. उच्च शिक्षणाच्या संधी अधिक व्यापक करण्याबरोबरच गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर शिक्षणाची दारे खुली करणारा हा निर्णय ठरणार आहे.

Related Posts

पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार का? कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या, पण केंद्राने दिली महत्त्वाची माहिती

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण झाली असली तरी भारतीय नागरिकांना पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तात्काळ दिलासा मिळण्याची शक्यता नाही. इंधन दर कमी होणार का, या चर्चेला…

बेस्ट कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; सरकारकडून MESMA लागू

मुंबई : विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे मुंबईतील सार्वजनिक बससेवा विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली असून, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र अत्यावश्यक…