मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. दरमहा मिळणाऱ्या १५०० रुपयांच्या आर्थिक मदतीवर अनेक महिलांची चिंता वाढली आहे. राज्यातील अपात्र लाभार्थ्यांची संख्या वाढत असून, सोलापूर जिल्ह्यातील जवळपास ५ लाख महिलांना योजनेचा लाभ मिळणे बंद झाले आहे.
योजनेच्या पात्रता निकषांची तपासणी केल्यानंतर अनेक महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आली आहेत. ई-केवायसी प्रक्रिया, वयाची अट आणि इतर नियमांमध्ये न बसणाऱ्या महिलांना अपात्र ठरवण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यातही सुमारे ५० हजार महिलांना याचा फटका बसला आहे. यामध्ये अनेक महिलांचे वय ६५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे त्यांची नावे योजनेतून वगळण्यात आली आहेत. अचानक पैसे येणे बंद झाल्याने अनेक लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे. सरकारकडून लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुरुवातीला पात्र महिलांच्या खात्यावर दरमहा १५०० रुपये जमा करण्यात येत होते. मात्र, त्यानंतर लाभार्थ्यांची पुन्हा पडताळणी करण्यात आली. या प्रक्रियेत नियमांमध्ये न बसणाऱ्या महिलांना योजनेतून बाहेर करण्यात आले.
दरम्यान, गेल्या दोन वर्षांत ज्या तरुणी किंवा विवाहित महिलांनी २१ वर्षे पूर्ण केली आहेत, त्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी नवीन अर्ज करता येत नसल्याची अडचण निर्माण झाली आहे. योजनेचे पोर्टल नवीन नोंदणीसाठी सुरू नसल्याने पात्र असूनही अनेक महिलांना लाभापासून दूर राहावे लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत राज्यातील सुमारे ८२ लाख लाभार्थी महिला विविध कारणांमुळे अपात्र ठरल्या आहेत. तर पात्र महिलांना अद्यापही योजनेचा १५०० रुपयांचा लाभ दिला जात आहे. लाडकी बहीण योजना ही राज्यातील लाखो महिलांसाठी आर्थिक आधार ठरली होती. मात्र आता पात्रतेच्या तपासणीनंतर अनेक महिलांच्या खात्यावर येणारी मदत थांबल्याने त्यांच्यामध्ये नाराजी आणि संभ्रमाचे वातावरण आहे.


