मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडीत प्रवासी अडकले

मुंबई. राज्यातील मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्‍यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले. एकीकडे मिसिंग लिंकच्या लोकार्पणामुळे मुंबई-पुणे वाहतूक आणखी जलद होणार असून प्रवाशांचा वेळ आणि इंधनही वाचणार आहे. त्यासोबतच, द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीही फुटणार असल्याचं सांगितलं जातंय. मात्र, नेमकं आजच या महामार्गावर गेल्या 5 ते 6 तासांपासून वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. स्वत: खासदार सुप्रिया सुळे यांनीही या वाहतूक कोंडीत अडकल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहतूक कोंडीमुळे त्रस्त प्रवासी आणि वाहनधारकांकडून टोल घेऊ नका, असे निर्देश दिले आहेत. मुंबई-पुणे वाहतूक कोंडीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ रस्ता मोकळा करुन अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्याच्या सूचना दिल्या आहेत. टोलनाके मोकळे करा, वाहनधारकांकडून पैसे घेऊ नका, असे निर्देश एकनाथ शिंदेंनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. पुण्याच्या पुढे साताऱ्यापर्यंत या वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. लांबच लांब वाहनांच्या रांगा, डोक्यावर उन्हाचा पारा वाढत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी वाहतूक कोंडीतील वाहनधारकांकडून टोल न घेण्याचे आदेश दिले आहे. 1 मे महाराष्ट्र दिन आणि शनिवार-रविवार अशा एका मागोमाग आलेल्या एक सुट्टी पाहता मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर लोणावळा घाटात पाच ते सहा तासांपासून वाहतूक कोंडी झाली आहे. सलग सुट्ट्यांमुळे घाटात मोठ्या प्रमाणात कोंडी झाली. आज सकाळपासून अनेक प्रवासी घाटात अडकले आहेत. प्रवाशांकडे पिण्यासाठी असलेलं पाणीही संपलं आहे. वाहतूक कोंडीत अडकलेल्या लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांनाही आता कडक उन्हाचा त्रास होऊ लागला आहे. खालापूर टोलनाक्यापासूनच ट्रॅफिकला सुरूवात झाली. मुंबईकडून पुण्याकडे येणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी 25-25 मिनिटांचे ब्लॉक घेतले जात आहेत. साताऱ्यातही पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटापासून पारगावपर्यंत वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे महाबळेश्वरहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहतुकीत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. सकाळपासून मुंबईहून साताऱ्याकडे येणारी वाहतूक खंडाळ्याच्या हद्दीत धीम्या गतीने सुरू आहे. खंडाळा भुईंज आणि महामार्ग पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

  • Related Posts

    टीकेच्या वादळानंतर प्रणित मोरेची माफी; जुन्या व्हिडिओंचीही होणार चौकशी.

    मुंबई : कॉमेडियन प्रणित मोरे यांच्या शोमधील वादग्रस्त वक्तव्यांमुळे निर्माण झालेल्या वादानंतर त्यांनी सार्वजनिकरित्या माफी मागितली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही क्लिप्समुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली असून आता या…

    जोरहाटमध्ये हवाई दलाचे AN-32 विमान कोसळले; 5 जवान शहीद

    आसाम : आसाममधील जोरहाट हवाई तळावर भारतीय हवाई दलाच्या AN-32 मालवाहू विमानाचा शनिवारी भीषण अपघात झाला. लँडिंगदरम्यान हे विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याने हवाई दलाच्या पाच जवानांना वीरमरण आले, तर सहवैमानिक जखमी…