मुंबईत घडलेल्या धक्कादायक मृत्यूच्या घटनेचा परिणाम आता थेट बाजारपेठेवर दिसून येत असून कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) मध्ये तब्बल 10 ते 12 ट्रक कलिंगडाचा माल विक्रीअभावी पडून आहे. एका कुटुंबाने बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगड खाल्ले आणि त्यानंतर चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले, त्यामुळे ग्राहकांनी अचानक कलिंगड खरेदीकडे पाठ फिरवली आहे. परिणामी लाखो रुपयांचा माल बाजारात पडून राहिला असून चार दिवसांपासून ट्रकमध्ये साठवलेल्या कलिंगडाची गुणवत्ता घसरत चालली आहे आणि अनेक ठिकाणी तो माल खराब होऊ लागला आहे. उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात मागणी असणाऱ्या कलिंगडाचे दरही आता कोसळले आहेत; यापूर्वी 50 रुपये प्रति किलोने विक्री होणारे कलिंगड सध्या कमी दरात उपलब्ध असतानाही ग्राहक पुढे येत नाहीत. अहिल्यानगर, बीड आणि नाशिक येथून माल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना तसेच ट्रक चालकांना याचा मोठा आर्थिक फटका बसला असून उत्पादन व वाहतूक खर्चही निघत नसल्याने ते हवालदिल झाले आहेत. वाहनांचे हप्ते कसे भरायचे, असा प्रश्नही चालकांसमोर उभा राहिला आहे. दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाने या मृत्यूचा कलिंगडाशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले असून वैद्यकीय तज्ज्ञांनीही नागरिकांनी भीती न बाळगता फळांचे सेवन करावे, असे आवाहन केले आहे; मात्र प्रशासनाच्या स्पष्टीकरणानंतरही नागरिकांमधील भीती कायम असल्याने त्याचा थेट परिणाम बाजारातील विक्रीवर होताना दिसत आहे.


