पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नुकतेच देशवासीयांना इंधन बचतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज सर्वांनाच चकित केले. मुख्यमंत्री फडणवीस चक्क ‘रॉयल एनफिल्ड 350’ या दुचाकीवरून विधान भवनात दाखल झाले. त्यांच्यासोबत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि मुख्यमंत्र्यांचा संपूर्ण सुरक्षा ताफादेखील दुचाकीवरच होता. इंधन बचत आणि साधेपणाचा संदेश देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी उचललेल्या या पावलाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली. ते म्हणाले की, “पंतप्रधानांनी जे काही निर्देश दिले आहेत ते देशहिताकरिता आहेत. त्यामुळे आपापल्या परीने जे जे करता येईल त्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करत आहोत. राज्यातले नेते मंडळी जेव्हा अशा प्रकारे प्रचार करतात, ते लोकांपर्यंत पोहोचते म्हणून मी आज मोटार सायकलने आलेलो आहे. आमचा ताफा देखील कमी केलेला आहे. सर्वांचा परदेशातील प्रवास देखील आम्ही रद्द केलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारे इंधन बचत कसे करता येईल, तसेच परकीय चलन बचत कशी करता येईल? हा आमचा प्रयत्न असेल.”
ते पुढे म्हणाले, ” उद्या साताऱ्याला एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचं आधीच नियोजन झालेले असल्याने आणि त्यावर आधीच पैसा खर्च झालेला असल्याने तो कार्यक्रम आम्ही रद्द केलेला नाही. पण, यानंतर पुढील सहा महिने आम्ही शासनाच्या वतीने कुठल्याही मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करणार नाही,” अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.
पंतप्रधानांच्या आवाहनावर विरोधकांनी केलेल्या टीकेचा समाचार घेताना फडणवीस म्हणाले, “विरोधी पक्षाला थोडी प्रगल्भता यावी लागेल. जगातील सर्व देश याहीपेक्षा कठोर निर्णय घेत आहेत. त्यावेळी पंतप्रधानांनी आपल्याला केवळ थोडासा त्याग करायला सांगितला आहे. कुठलेही कठोर निर्णय घेण्यात आलेले नाहीत. त्यावर इतका गदारोळ उभे करणे योग्य नाही. यापूर्वी इंदिरा गांधी असताना असे झालेले आहे. चिदंबरम यांनीदेखील २०१२ साली अशा प्रकारचा निर्णय घेतला होता. त्यामुळे असे वागणे योग्य नाही. आंतरराष्ट्रीय परिस्थिती अशी तयार झाल्यामुळे देश हितासाठी आपण थोडेही जुळवून घ्यायला तयार नसलो तर विरोधी पक्षाला प्रगल्भता नाही, असेच म्हणावे लागेल.”
पंतप्रधान मोदींच्या 15 तारखेच्या परदेश दौऱ्यावरून होणाऱ्या टीकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला. ते म्हणाले की, “देशाच्या पंतप्रधानांच्या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणे, यापेक्षा जास्त मूर्खपणाचे लक्षणच असू शकत नाही. देशाचे पंतप्रधान जेव्हा परदेशात जातात, तेव्हा स्ट्रॅटेजिक अलायन्सेस होतात. देशाच्या अर्थव्यवस्थेला त्याचा फायदा होतो. पंतप्रधानांनी सांगताना जे काही विदेश प्रवास करू नये असे म्हटले आहे, ते अनावश्यक किंवा टाळता येण्यासारखे आहे. याचा अर्थ असा नाही की, आपला कोणी व्यापारी परदेशात एक मोठी डील करत असेल तर त्यांनी ती डीलच रद्द करून टाकावी. जे अशा प्रकारचे टीका करत आहेत ते बिनडोकच आहेत,” असे त्यांनी म्हटले.


