खेळता खेळता मृत्यूने घाला घातल्याची एक भीषण घटना पुणे (Pune) जिल्ह्यातील जुन्नर (Junnar) तालुक्यातील बल्लाळवाडी येथे घडली आहे. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास दोन चिमुकल्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बल्लाळवाडी येथील गाडेकर यांच्या शेतात असलेल्या शेततळ्यापाशी ही मुले खेळत होती. खेळत असताना त्यांचा अंदाज चुकला आणि ती तळ्यात पडली. बराच वेळ मुले घरी न आल्याने शोधाशोध सुरू झाली असता ही धक्कादायक बाब उघडकीस आली. मृत मुलांची आडनावे पवार आणि नवले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तत्काळ पोलीस आणि स्थानिक रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. रेस्क्यू टीमने शर्थीचे प्रयत्न करून दोन्ही मुलांचे मृतदेह शेततळ्यातून बाहेर काढले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे बल्लाळवाडी परिसरात नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
ग्रामीण भागात शेतीसाठी शेततळी वरदान ठरत असली तरी, अनेकदा सुरक्षिततेच्या कारणास्तव ती जीवघेणी ठरत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. शेततळ्यांना संरक्षक जाळी किंवा कुंपण नसल्याने अशा दुर्घटना वारंवार घडत असून, प्रशासनाने आणि शेतकरी बांधवांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. दोन निष्पाप जीवांचा अशा प्रकारे अंत झाल्याने जुन्नर तालुक्यात मोठी शोककळा पसरली आहे.


