अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख ) : पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश पर्यावरण मंचाच्या वतीने २३ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०२६ दरम्यान ‘पर्यावरण सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. “आपली छोटी कृती, पर्यावरणाची मोठी सुरक्षा” या संदेशातून पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या दैनंदिन जीवनात छोट्या-छोट्या सवयी अंगीकारण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत नागरिकांनी किमान एक स्थानिक झाड लावून त्याची नियमित काळजी घ्यावी, पाण्याची बचत करावी, गळतीचे नळ दुरुस्त करावेत तसेच पावसाचे पाणी साठविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळून कापडी किंवा पुनर्वापर करता येणाऱ्या पिशव्यांचा वापर करणे, ओला व सुका कचरा वेगळा करणे आणि घरच्या घरी कंपोस्टिंग सुरू करणे, परिसरातील स्वच्छता मोहिमांमध्ये सहभागी होणे तसेच कचरा जाळणे टाळणे, या बाबींवरही विशेष भर देण्यात आला आहे. पर्यावरण संवर्धनाबरोबरच पक्षी व जैवविविधतेसाठी पाणी आणि सुरक्षित अधिवास उपलब्ध करून देणे, घराच्या परिसरात देशी वनस्पती लावणे, शक्य असेल तेव्हा सायकल किंवा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे आणि अनावश्यक वीज वापर टाळणे, असे विविध संदेश या पर्यावरण सप्ताहाच्या माध्यमातून देण्यात आले आहेत.
वस्तूंचा पुनर्वापर व दुरुस्तीला प्राधान्य देऊन अनावश्यक खरेदी कमी करणे, तसेच पर्यावरणपूरक सवयींबाबत कुटुंबीय व मित्रपरिवारामध्ये जनजागृती करणे, ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे मंचाने नमूद केले आहे. आठवड्यातील एक दिवस ‘निसर्गासाठी एक दिवस’ म्हणून पाळण्याचा संकल्प करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. “हरित पर्यावरण, निरोगी जीवन — आजची कृती, उद्याचे सुरक्षित भविष्य!” या संदेशातून पर्यावरण रक्षणाची चळवळ अधिक व्यापक करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. पर्यावरणाचे रक्षण ही केवळ शासन किंवा एखाद्या संस्थेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. आपल्या छोट्या-छोट्या कृतीतून पर्यावरणाचे संरक्षण करून भावी पिढ्यांसाठी स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित जग निर्माण करूया, असे आवाहन भारतीय मजदूर संघाचे प्रदेश महामंत्री किरण मिलगीर यांच्याकडून करण्यात आले आहे


