कराड (सातारा) : सातारा जिल्ह्यातील कोयना धरणातील पाणीसाठा आता 100 टीएमसीच्या अगदी जवळ पोहोचला आहे. सध्या धरणात 99.31 टीएमसी पाणीसाठा असून, आज शनिवारी संध्याकाळपर्यंत किंवा उद्या रविवारपर्यंत 100 टीएमसीचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोयना धरणाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
यंदा सातारा जिल्ह्यात मान्सूनचे आगमन काहीसे उशिराने झाले. 29 जूनपासून पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर काही दिवस पावसाने विश्रांती घेतली, तर काही काळ मुसळधार पावसाने हजेरी लावली. या बदलत्या पावसामुळे कोयना धरणात पाण्याची आवक वाढत गेली आणि धरणाची पाणीपातळीही झपाट्याने वर आली. पावसाचा जोर वाढलेल्या काळात धरणाचे दरवाजे सहा फुटांपर्यंत उचलून कोयना नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्याने आवकही घटली. त्यामुळे परिस्थितीचा अंदाज घेत धरणातून कोयना नदीपात्रात सुरू असलेला विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
कोयना, नवजा, महाबळेश्वरमध्ये किती पाऊस?
शुक्रवारी सायंकाळी 5 वाजल्यापासून शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंत कोयनानगर येथे 13 मिमी, नवजा येथे 22 मिमी, तर महाबळेश्वर येथे 16 मिमी पावसाची नोंद झाली. याच कालावधीत कोयना धरणातील पाणीसाठ्यात 0.53 टीएमसीने वाढ झाली आहे. सध्या धरणात 99.31 टीएमसी पाणी असून, आणखी काही आवक झाल्यानंतर 100 टीएमसीचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण होण्याची शक्यता आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर सध्या कमी असला तरी धरणातील पाणीसाठा समाधानकारक पातळीवर आहे. त्यामुळे 100 टीएमसीचा टप्पा नेमका कधी गाठला जातो, याकडे सातारा जिल्ह्यासह कोयना परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


