अरुण लखानी आणि आमची राजकीय विचारधारा वेगळी, त्याचा कौटुंबिक नात्याशी संबंध नाही: सुप्रिया सुळे

भाजपने चंद्रपूर-गडचिरोली- वर्धा या विधानपरिषदेच्या जागेवरुन उद्योगपती अरुण लखाणी यांना उमेदवारी दिली होती. अरुण लाखानी हे शरद पवार गटाचे खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही आहेत. सध्याच्या राजकारणात शरद पवार गट आणि भाजप (BJP) हे परस्परविरोधी विचारसरणीचे प्रतिनिधित्व करतात. सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि अरुण लखाणी (Arun Lakhani) यांच्या कुटुंबीयांनी अलीकडेच पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन रेवती-सारंग यांच्या लग्नाचे निमंत्रण त्यांना दिले होते. यानंतर काही दिवसांतच अरुण लखाणी यांना भाजपकडून विधानपरिषदेची उमेदवारी मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या. याविषयी मंगळवारी पुण्यातील पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे यांना विचारणा करण्यात आली. यावेळी त्यांनी अरुण लखाणी यांना भाजपकडून मिळालेल्या उमेदवारीसंदर्भात भाष्य केले.
अरुण भाईंची राजकीय विचारधारा आहे. त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळाली आहे. यामध्ये आमच्या कौटुंबिक नात्याचा संबंध नाही. त्यांनी त्यांचं राजकारण करावं, आम्ही आमचं करु. यामध्ये आमच्या मुलांचा काय संबंध?, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवरही भाष्य केले. त्यांनी म्हटले की, ‘संजय राऊत साहेब आमचे मोठे भाऊ आहेत. त्यांना आम्हाला सगळं बोलण्याचा अधिकार आहे’, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
दरम्यान, अरुण लखाणी आणि त्यांचे कुटुंबीय नुकतेच सुप्रिया सुळे यांच्या घरी येऊन गेले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी विहीणबाईंना हळदी-कुंकू लावून त्यांचे औक्षण करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अरुण लखाणी यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळाल्यानंतर संजय राऊत यांनी त्यावर टिप्पणी केली होती. अरुण लखाणी हे जन्मजात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहेत. त्यांना भाजपने उमेदवारी दिली यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. हे लखाणी काय काँग्रेसमधून गेलेले नाहीत. लखाणी यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली जाऊ शकते, अशी खोचक टिप्पणी संजय राऊत यांनी केली होती.
त्यांच्या गटात काय चाललंय मला माहित नाही. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार वाढत चालली आहे. पेट्रोल डिझेलचे भाव वाढतात. त्यामुळे त्यांचा गट कसा चालतो, हे मी पाहत नाही आणि पाहायला वेळ कमी मिळतो. त्यांच्या निर्णयामध्ये बोलण्याचा मला अधिकार नाही, त्याचं काही कारण नाही. माणुसकीच्या नात्याने प्रत्येक पक्षाने काय आणि कोणाला काय द्यायचं हा त्यांचा प्रश्न आहे. पण ज्या लोकांनी संघर्ष केला त्यांना दुखवून निर्णय घेण्याचा कारण नाही. मी त्या लोकांबरोबर काम केलं आहे अतिशय कर्तृत्ववान आणि कष्टाळू लोक आहेत, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

Related Posts

LPG ग्राहकांना महागाईचा आणखी फटका; गॅस सिलिंडर महाग, अनुदानित सिलिंडरची संख्या घटली

देशभरातील एलपीजी ग्राहकांसाठी चिंतेची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने जून महिन्यात एलपीजी संदर्भात घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांमुळे घरगुती ग्राहकांसह उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांवरही अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता व्यक्त केली…

नागपुरातील रस्त्यांवर हायकोर्टाचा सवाल; “मेट्रोसिटी म्हणायचं, पण रस्त्यांची ही अवस्था का?”

नागपूर : शहरातील काँक्रीट रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर महानगरपालिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही नागरिकांना मूलभूत…