मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग आला असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले होते. मात्र, ही केवळ सदिच्छा भेट होती आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्टीकरण शिंदे यांनी दिले.
दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले की, बैठकीत शिवसेनेच्या खासदारांच्या मतदारसंघांतील विकासकामांवर सविस्तर चर्चा झाली. रेल्वे, रस्ते, शिक्षण, शाळा आणि इतर पायाभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांचे निवेदन अमित शहा यांच्याकडे देण्यात आले. संबंधित केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करून हे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याचेही शिंदे यांनी सांगितले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे समन्वयाची जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. खासदार आणि केंद्र सरकार यांच्यात समन्वय राखण्याची भूमिका पार पाडण्यास अमित शहा यांनी स्वतः त्यांना सांगितल्याचे शिंदे यांनी नमूद केले.
घटनादुरुस्ती विधेयक आणि महिला आरक्षणाबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, मतदारसंघांची लोकसंख्या वाढल्यामुळे पुनर्रचना आवश्यक आहे. महिला आरक्षणामुळे महिलांना अधिक संधी मिळतील आणि विकासाला गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावर टीका केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले, “प्रत्येक आरोपाला उत्तर देणे आवश्यक नाही. त्यासाठी आमच्या पक्षाचे प्रवक्ते आहेत.”


