रत्नागिरी : कोकणातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ गणपतीपुळे येथे शनिवारी सकाळी घडलेल्या दुर्घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगर येथून फिरण्यासाठी आलेल्या ८ पर्यटकांपैकी ५ जण समुद्रात बेपत्ता झाले असून ३ जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे १० वाजण्याच्या दरम्यान पर्यटकांचा हा गट समुद्रात उतरला होता. मात्र, समुद्रातील पाण्याचा वाढता वेग आणि भरतीचा अंदाज न आल्याने सर्वजण अडचणीत सापडले. काही क्षणांतच ८ जण समुद्राच्या प्रवाहात वाहू लागल्याने घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.पर्यटक संकटात असल्याचे लक्षात येताच स्थानिक जीवरक्षक आणि नागरिकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. या प्रयत्नांत ३ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मात्र, उर्वरित ५ जणांचा अद्याप शोध लागलेला नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलीस, प्रशासन, जीवरक्षक आणि स्थानिक मच्छीमारांनी घटनास्थळी धाव घेतली. बेपत्ता ५ पर्यटकांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवली जात असून समुद्रात आणि किनारपट्टी परिसरात शोधकार्य सुरू आहे.दरम्यान, या घटनेमुळे गणपतीपुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून पर्यटकांनाही सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पावसाळी हंगामात समुद्रातील भरती आणि प्रवाहाचा अंदाज न घेतल्यास अशा घटना घडू शकतात, असे स्थानिकांकडून सांगितले जात आहे.


