चंद्रपूर , गौरव पराते ( प्रतिनिधी ) : मूल तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वाळू, मुरूम आणि मातीची अवैध तस्करी सुरू असून, याला महसूल प्रशासनाची मूक संमती असल्याचा आरोप चांदापूर ग्रामपंचायतीचे प्रशासकीय सदस्य तथा माजी उपसरपंच अशोक मार्कंडी मार्गानवार यांनी चंद्रपूर येथे पत्रपरिषदेत केला.
शासनाच्या वाळू धोरणानुसार, वाळू घाटातून उत्खनन व वाहतूक करण्यापूर्वी कंत्राटदारांना उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयामार्फत हद्द कायम मोजणी करून ताबा देणे बंधनकारक आहे. मात्र, येथील तहसीलदारांनी कोणतीही मोजणी न करताच कंत्राटदारांना वाळू उपसा करण्यासाठी ताबा दिल्याचा आरोप मार्गानवार यांनी केला.
भूमी अभिलेख कार्यालयाच्या नियमानुसार तातडीची मोजणी करण्यासाठी पंधरा दिवसांचा अवधी लागतो. माहिती अधिकारांतर्गत विचारणा केली असता, तहसीलदार यांच्या पत्रानंतर केवळ एकाच वाळूघाटाची मोजणी झाल्याची माहिती समोर आली. या प्रकारामुळे राष्ट्रीय संपत्तीचे होणारे नुकसान रोखण्यासाठी आणि संबंधितांवर वचक निर्माण करण्यासाठी तहसीलदारासह उपविभागीय अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री आणि नागपूरच्या विभागीय आयुक्तांकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती अशोक मार्कंडी मार्गानवार यांनी दिली.


