मुंबई : गेल्या आठवड्यात मुसळधार पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना झोडपून काढल्यानंतर आता पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, पुढील सहा ते सात दिवस मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील बहुतांश भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. राज्यासाठी कोणताही विशेष पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला नाही.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पावसासाठी पोषक वातावरण सध्या तयार झालेले नाही. त्यामुळे पुढील काही दिवस तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता असली तरी व्यापक स्वरूपाचा पाऊस अपेक्षित नाही.
आर्द्रता वाढणार, उकाडा जाणवणार
महिन्याच्या सुरुवातीला मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, रायगड आणि पालघर परिसरात जोरदार पाऊस झाला होता. मात्र मागील दोन दिवसांपासून पाऊस थांबल्याने वातावरणातील आर्द्रता वाढू लागली आहे. पुढील आठवड्यात मुंबई परिसरात तापमान सुमारे ३३ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
कोकणात तापमानात वाढ
कोकण विभागातही उकाड्याचा जोर वाढताना दिसत आहे. डहाणू आणि अलिबाग येथे ३३.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. अलिबागमध्ये तापमान नेहमीपेक्षा ३.३ अंशांनी, तर डहाणूत २.७ अंशांनी अधिक नोंदवले गेले.
विदर्भ सर्वाधिक तापला
मध्य महाराष्ट्रातील सोलापूर येथे ३५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर विदर्भात उष्णतेचा सर्वाधिक प्रभाव दिसून आला. चंद्रपूरमध्ये तापमान ३६ अंशांच्या पुढे गेले असून राज्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद येथे झाली.
काय राहणार पुढील स्थिती?
हवामान तज्ज्ञांच्या मते, पुढील सात दिवस राज्यात मोठ्या पावसाची शक्यता कमी आहे. काही भागांत हलक्या सरी पडू शकतात; मात्र सध्या तरी मुसळधार पावसापासून नागरिकांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.


