पुणे : आषाढी वारीदरम्यान सोमवारी सकाळी जेजुरी टोल नाक्याजवळ दिंडीत ट्रक घुसल्याने झालेल्या भीषण अपघातानंतर संपूर्ण आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली आहे. अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्यांचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालय, जेजुरी येथे तातडीने करण्यात आले असून, त्यांचे पार्थिव सन्मानाने त्यांच्या मूळ गावी पोहोचवण्यासाठी शासनाने विशेष व्यवस्था केली आहे.
या घटनेनंतर राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ मदतकार्याचे आदेश दिले. जखमी वारकऱ्यांना वेळ न दवडता विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन देवमाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रताप साळवे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. जखमी वारकऱ्यांवर महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार सुरू आहेत. गीताबाई शेलार (७०), शैलजा दिनकर जगताप (६०) आणि मंगल विलास पाटील (७०) यांच्यासह अन्य जखमींवर ग्रामीण रुग्णालय, जेजुरी येथे उपचार सुरू आहेत. सात गंभीर जखमींना आनंदी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले असून, त्यापैकी एका अतिगंभीर रुग्णाला पुढील उपचारांसाठी ससून सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
वारकरी बांधवांच्या चेहऱ्यावरची वेदना आणि कुटुंबीयांच्या डोळ्यातील अश्रू पाहता आरोग्य विभागातील कर्मचारीही संवेदनशीलतेने मदत करताना दिसत आहेत. मृत वारकऱ्यांचे पार्थिव लवकरात लवकर त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचावे, यासाठी प्रशासनाने स्वतंत्र व्यवस्था उभारली आहे.आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. शासन आणि आरोग्य विभाग प्रत्येक वारकऱ्याच्या सेवेसाठी तत्पर असून, वारीदरम्यान कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास संपूर्ण यंत्रणा तातडीने मदतीसाठी सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

