उभादांडा, कोकण , आशिष औंढेकर ( प्रमुख पश्चिम महाराष्ट्र ) : कविता, साहित्य आणि वाचनसंस्कृतीच्या माध्यमातून गावागावांत साहित्याची चळवळ रुजविण्याचा संकल्प घेऊन कार्यरत असलेल्या “जगातील पहिलं कवितांचं गाव – माझं कवितांचं गाव, जकातवाडी, राजधानी सातारा” येथील शिष्टमंडळाने आज कोकणातील उभादांडा या कवितेच्या गावाला सदिच्छा भेट दिली. या शिष्टमंडळात प्रल्हाद पारटे – राष्ट्रीय अध्यक्ष, विश्वास नेरकर – राष्ट्रीय उपाध्यक्ष, आत्माराम रसाळ आणि शुभम पारटे – सदस्य यांचा समावेश होता.
या भेटीदरम्यान शिष्टमंडळाने उभादांडा गावातील नागरिकांशी मनमोकळा संवाद साधला. गावातील साहित्यिक वातावरण, कवितेची परंपरा, वाचनसंस्कृती तसेच गावात राबविण्यात येणाऱ्या विविध साहित्यिक उपक्रमांची माहिती जाणून घेतली. यावेळी समृद्धी पेठेकर आणि निलेश धुरी यांनी शिष्टमंडळाला उभादांडा येथील कवितेच्या गावाची संकल्पना, साहित्यिक उपक्रम, कवितेची परंपरा आणि गावातील वाचनसंस्कृती याबाबत सविस्तर माहिती दिली. उभादांडा गावाने कवितेला आणि साहित्याला दिलेले महत्त्व, तसेच गावात निर्माण झालेले साहित्यिक वातावरण याविषयी त्यांनी संवाद साधला.
पुस्तक दालनाची पाहणी
शिष्टमंडळाने यावेळी उभादांडा येथील पुस्तक दालनाची पाहणी केली. विविध साहित्यिकांची पुस्तके, काव्यसंग्रह आणि साहित्यविषयक साहित्य पाहताना शिष्टमंडळाने समाधान व्यक्त केले. गावातील नागरिकांमध्ये पुस्तकांविषयी निर्माण झालेली आवड आणि वाचनसंस्कृतीचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
मंगेश पाडगावकरांच्या भूमीला भेटीचा आनंद
मराठीतील ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांच्या गावाला भेट देण्याचा आनंद शिष्टमंडळातील सदस्यांसाठी विशेष भावनिक ठरला. पाडगावकरांच्या काव्यसंपदेची आठवण जागवत त्यांच्या भूमीत साहित्यिक वातावरणाचा अनुभव घेणे हा सर्वांसाठी अविस्मरणीय क्षण ठरला. यावेळी मंगेश पाडगावकर यांच्या शाळेलाही भेट देण्यात आली. शिष्टमंडळाने विद्यार्थ्यांसमोर कवितांचे सादरीकरण केले. कविता, साहित्य आणि वाचन याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला.
“माझं कवितांचं गाव – जकातवाडी” आणि उभादांडा या दोन्ही साहित्यिक संकल्पनांमधील अनुभवांची देवाणघेवाण व्हावी, कविता आणि वाचनसंस्कृतीला चालना मिळावी आणि गावागावांत साहित्यिक वातावरण निर्माण व्हावे, या दृष्टीने ही भेट महत्त्वपूर्ण ठरली. यावेळी प्रल्हाद पारटे, विश्वास नेरकर, आत्माराम रसाळ आणि शुभम पारटे यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. भविष्यात साहित्यिक उपक्रमांच्या माध्यमातून परस्पर सहकार्य वाढविण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. कविता, पुस्तके, साहित्यिक संवाद आणि माणसांमधील आपुलकी यामुळे उभादांडा भेट शिष्टमंडळासाठी संस्मरणीय ठरली.
“एक गाव कवितेने समृद्ध झाले,
तर अनेक मने साहित्याने उजळतात!”
जगातील पहिलं कवितांचं गाव
“माझं कवितांचं गाव, जकातवाडी”
राजधानी सातारा


