एलपीजी गॅस कनेक्शनधारकांमध्ये सध्या ३० जून २०२६ नंतर गॅस कनेक्शन बंद होणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. सोशल मीडियावर आणि काही माध्यमांमधून इंडेन, भारत गॅस आणि एचपी गॅसचे कनेक्शन बंद केले जाणार असल्याचे दावे केले जात असले तरी केंद्र सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
मार्च २०२६ मध्ये केंद्र सरकारने पीएनजी (पाइप्ड नॅचरल गॅस) वापराला प्रोत्साहन देण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले होते. ज्या भागांमध्ये पीएनजी सुविधा उपलब्ध आहे, त्या ठिकाणी नागरिकांनी हळूहळू पीएनजीचा स्वीकार करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. याचबरोबर “नो ड्युअल कनेक्शन पॉलिसी” लागू करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या घरात आधीपासून पीएनजी कनेक्शन आहे, त्यांना नवीन एलपीजी कनेक्शन मिळणार नाही. काही प्रकरणांमध्ये एलपीजी कनेक्शन सरेंडर करण्याची प्रक्रिया लागू होऊ शकते.पीएनजी स्वीकारण्यासाठी सरकारने ९० दिवसांचा कालावधी दिला होता. हा कालावधी जूनअखेर संपत असल्याने अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र ३० जूननंतर सर्व एलपीजी कनेक्शन आपोआप बंद होतील, असे पेट्रोलियम मंत्रालयाने कुठेही स्पष्ट केलेले नाही.
मंत्रालयाच्या माहितीनुसार, मार्च २०२६ पासून आतापर्यंत १० लाखांहून अधिक पीएनजी कनेक्शन सुरू करण्यात आले आहेत. अनेक ग्राहकांनी पीएनजीसाठी नोंदणी केली असून काही कुटुंबांनी एलपीजीऐवजी पीएनजीचा पर्याय स्वीकारला आहे.सरकारच्या मते पीएनजी अधिक सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि सोयीस्कर पर्याय आहे. सिलेंडर बुकिंगची गरज नसल्याने ग्राहकांना अखंड गॅस पुरवठा मिळू शकतो. त्यामुळे सरकार पीएनजीचा वापर वाढवण्यावर भर देत आहे.
दरम्यान, इंडेन, भारत गॅस आणि एचपी गॅसचा पुरवठा सध्या सुरळीत सुरू असून ग्राहकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.


