लातूर : जून महिना अर्धा उलटूनही पावसाने पाठ फिरवल्याने लातूरकरांना पुन्हा एकदा कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना सध्या ३७ ते ३८ अंश सेल्सिअस तापमानाच्या झळा सहन कराव्या लागत असून, औराद शहाजनी येथे तापमान चाळिशीच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. त्यामुळे वाढत्या उष्णतेने नागरिक हैराण झाले आहेत.
मार्च महिन्यापासूनच तापमानात सातत्याने वाढ होत असून एप्रिल आणि मे महिन्यातील उष्णतेचा प्रभाव अद्याप कायम आहे. जूनच्या सुरुवातीला जिल्ह्यात काही ठिकाणी दोन दिवस मॉन्सूनपूर्व पाऊस झाला होता. त्यामुळे काही काळ वातावरणात गारवा निर्माण झाला होता. मात्र त्यानंतर पावसाने विश्रांती घेतल्याने पुन्हा उकाडा वाढला आहे.शहरासह ग्रामीण भागात सकाळपासूनच उन्हाचा तडाखा जाणवत आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांची अक्षरशः लाहीलाही होत असून, त्यातच विजेचा लपंडाव सुरू असल्याने त्रासात अधिक भर पडत आहे. परिणामी घराबाहेर पडताना नागरिक टोपी, गॉगल, उपरणे आणि पाण्याची बाटली सोबत ठेवताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, जून महिन्यात सामान्यतः छत्री आणि रेनकोटची गरज भासते. मात्र यंदा परिस्थिती वेगळी असून पावसाऐवजी उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकांना तयारी करावी लागत आहे.गेल्या वर्षी मे महिन्यापासूनच जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली होती. त्यानंतर ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर कायम राहिल्याने काही भागांत पूरस्थितीही निर्माण झाली होती. मात्र यंदा मे महिना पूर्णपणे कोरडा गेला असून जूनमध्ये केवळ दोन दिवसच पावसाची नोंद झाली आहे.पावसाअभावी शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या असून सर्वसामान्य नागरिकांसह बळीराजाही आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. आता लातूरकरांना दिलासा देणाऱ्या पावसाची प्रतीक्षा अधिकच वाढली आहे.


