NEET-UG पुनर्परीक्षेसाठी NTA ची तयारी पूर्ण; बायोमेट्रिक पडताळणीसह सुरक्षा उपाय कडक

नवी दिल्ली : NEET-UG 2026 पुनर्परीक्षा 21 जून रोजी होणार असून, त्यासाठी राष्ट्रीय चाचणी संस्था (NTA) ने उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुरक्षितता राखण्यासाठी यंदा बायोमेट्रिक पडताळणीसह विविध सुरक्षा उपायांवर विशेष भर देण्यात आला आहे.
NTA च्या निर्देशांनुसार, परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येक उमेदवाराची सुरक्षा तपासणी केली जाईल. त्यानंतर बायोमेट्रिक पडताळणीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. मात्र, तांत्रिक अडचणी, सर्व्हर कनेक्टिव्हिटी किंवा अन्य कारणांमुळे पडताळणी होऊ शकली नाही, तरीही संबंधित विद्यार्थ्याला परीक्षेला बसण्याची संधी दिली जाईल. अशा वेळी केंद्रावर आवश्यक घोषणापत्र भरावे लागणार आहे.उमेदवारांना हलके आणि साधे कपडे परिधान करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. धार्मिक कारणांमुळे विशिष्ट पोशाख किंवा चिन्हे वापरणाऱ्या विद्यार्थ्यांनाही परवानगी असेल, मात्र त्यांनी तपासणी प्रक्रियेसाठी केंद्रावर वेळेआधी पोहोचावे, असे NTA ने स्पष्ट केले आहे.
परीक्षा हॉलमध्ये पारदर्शक पाण्याची बाटली आणि प्रवेशपत्र ठेवलेले पारदर्शक प्लास्टिक पाऊच नेण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, मोबाईल फोन, स्मार्टवॉच, ब्लूटूथ उपकरणे, इअरफोन तसेच इतर कोणतीही इलेक्ट्रॉनिक साधने आणण्यास सक्त मनाई असेल. याशिवाय जड दागिने, मोठे बेल्ट बकल्स आणि धातूच्या वस्तूंवरही निर्बंध घालण्यात आले आहेत.दिव्यांग आणि अतिरिक्त वेळेसाठी पात्र उमेदवारांना नियमानुसार अधिक वेळ दिला जाणार आहे. NTA ने सर्व विद्यार्थ्यांना वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचून सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. बायोमेट्रिक पडताळणीस विनाकारण विरोध केल्यास त्याला नियमभंग मानले जाऊ शकते, असा इशाराही संस्थेने दिला आहे.दरम्यान, ही पुनर्परीक्षा दुपारी 2 ते सायंकाळी 5.15 या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे.

Related Posts

पावसाची प्रतीक्षा कायम; लातूरकरांना पुन्हा उन्हाचे चटके, तापमान ३८ अंशांवर

लातूर : जून महिना अर्धा उलटूनही पावसाने पाठ फिरवल्याने लातूरकरांना पुन्हा एकदा कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना सध्या ३७ ते ३८ अंश सेल्सिअस तापमानाच्या झळा…

नागपूर विमानतळाच्या नव्या पर्वाची सुरुवात! २५ जूनपासून जीएमआरकडे कारभार

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासाला आता नवी दिशा मिळणार आहे. येत्या २५ जून रोजी नागपूर विमानतळाचा कारभार अधिकृतपणे जीएमआर समूहाकडे हस्तांतरित केला जाणार असून, यामुळे विमानतळाच्या आधुनिकीकरण…